CJP Protest Pune : ‘कॉकरोच जनता पार्टी’चं पुण्यातील आंदोलन संपलं; केल्या ‘या’ 5 मोठ्या मागण्या, अन्यथा…
CJP Protest Pune : वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि 'सीबीएसई' (CBSE) परीक्षांमधील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

CJP Protest Pune : वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’ (CBSE) परीक्षांमधील गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. याच मुद्द्यावरून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने एक मोठे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर आगामी २० जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा चळवळीचे मुख्य समन्वयक अभिजीत दीपके यांनी दिला आहे.
या आंदोलनात प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचूक आणि समन्वयक अभिजित दीपके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तरुणांचा आवाज उठवणाऱ्या या आंदोलनाला पुणेकर तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
आंदोलनाच्या सुरुवातीला हैदराबाद विद्यापीठातील दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
आंदोलकांच्या ५ प्रमुख मागण्या –
कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर खालील मागण्या मांडल्या आहेत.
१. विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई: जर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर त्याचा फटका बसलेल्या प्रत्येक प्रभावित विद्यार्थ्याला शासनाकडून १०,००० रुपये आर्थिक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.
२. कंपन्यांचे कडक ऑडिट: परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट झाले पाहिजे. मंत्र्यांच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अशी टेंडर्स मिळता कामा नयेत.
३. निकालाची मुदत: परीक्षेचा निकाल एका ठराविक आणि निश्चित मुदतीतच जाहीर झाला पाहिजे.
४. वाहतूक खर्च: विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च शासनाने उचलला पाहिजे.
५. हिंदवी साम्राज्याचा नकाशा: NCERT च्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा.
द्वेषाच्या राजकारणाला पूर्णविराम द्या –
आंदोलनादरम्यान तरुण पिढी आता कोणत्याही हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक राजकारणाला बळी पडणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सरकारचे हिंदू-मुस्लिम राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला.
अभिजीत दीपके यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर –
“आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत,” या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला अभिजीत दीपके यांनी सडेतोड उत्तर दिले. दीपके म्हणाले, “हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? आम्हाला संविधान माहीत नाही, आम्ही फक्त पुस्तक हातात पकडले आहे, अशी टीका आमच्यावर होते. मग चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, ते आधी त्यांनी सांगावे.”





