Sushma Andhare : आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजनल पक्ष आहेत.! अखेर सुषमा अंधारे यांनी मनातलं बोलूनच टाकलं, दुसरा गट स्थापन होणार का?
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती.

Sushma Andhare | Shiv Sena : राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ प्रवेशाची तारीख ठरायची आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
कृपाल तुमाने यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याने संबंधित आमदार आणि खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असून लवकरच मोठी राजकीय घडामोड घडेल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. त्यानंतरच ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेबाबत विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावर बोलताना शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पक्षाचे आर्धे अधिक लोक त्याच गटाचे , मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं. मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजनल पक्ष आहेत, असं सांगायचं.
मग पक्षातून बाजुला पडलेल्या पक्षाने भाजपला पाठिंबा द्यायचा. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी आणि नंतर राष्ट्रवादीसाठी वापरण्यात आली. उद्या कदाचित पंजाबमध्ये आपसाठी देखील ही पद्धत वापरली जाईल.
या सगळ्यांमधून एक गोष्ट आपल्या लक्षात येत आहे का? हे सगळं जे होतय, त्याला कारण एकच आहे, भाजप निरपेक्ष पद्धतीने निवडणुका लढवू शकत नाही. भाजप जनमत मिळू शकत नाही, भाजपच्या पाठिमागे जनमत नाही.
हे भाजपला पक्क माहीत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या यंत्रणा हाताशी धरून भाजपा निवडून आलेल्या लोकांनाच पुन्हा आपल्या बाजुने वळवण्याचा प्रयत्न करत आहे, विशेष म्हणजे जे लोक बाहेर पडतात त्यांना एक स्क्रिप्ट देखील दिली जाते.
शिवसेनेला हिंदुत्वाची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीसाठी नेतृत्वाचा मुद्दा, तर तृणमूल काँग्रेससाठी कदाचित अजून आयटी सेलने स्क्रिप्ट लिहिलेली नाहीये, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
उदय सामंतांनी दावे फेटाळले
कृपाल तुमाने यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे गटातील कोणत्याही खासदाराशी आमचा संपर्क नाही.
अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. आम्हाला ‘ऑपरेशन टायगर’ची गरजही नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.







