Jamkhed News : जामखेडमध्ये ट्रॅफिकचा ‘महाजाम’; दोनच पोलिसांवर शहराचा डोलारा, नागरिकांडून आंदोलनाचा इशारा
जामखेड (Jamkhed News) शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून, नागरिकांना दररोज तासनतास या कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

Jamkhed News : जामखेड (Jamkhed News) शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून, नागरिकांना दररोज तासनतास या कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
खर्डा चौक ते बीड रोड या मुख्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा (Jamkhed News) लागणे आता नित्याचेच झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जामखेडकरांचे जगणे मुश्किल झाले आहे. महामार्गावर मोठ्या गाड्या आणि दुचाकींची प्रचंड गर्दी झाल्याने रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे.
केवळ दोन पोलिसांवर शहराचा भार
वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाहनांच्या तुलनेत शहरात (Jamkhed News) केवळ दोन वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. या दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण शहराच्या वाहतुकीचे नियमन करण्याचा प्रचंड ताण येत आहे. त्यातच, या पोलिसांना वारंवार इतरत्र व्हीआयपी ड्युटी किंवा बंदोबस्तासाठी पाठवले जाते.
अशा वेळी मुख्य चौकांमध्ये कोणीही नियत्रंण ठेवणारे नसल्याने वाहतुकीचा मोठा गोंधळ उडतो. अरुंद रस्ते आणि वाहनांची बेशिस्त यामुळे बस आणि ट्रकसारखी अवजड वाहने एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत.
अपूर्ण रस्ते आणि अतिक्रमणांचा अडथळा
खर्डा चौक ते बीड रोड या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्याबाबत नगरपरिषद आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. रस्त्यावर पडलेली खडी आणि मातीमुळे धूळ प्रदूषणही वाढत आहे, ज्याचा फटका वाहनधारकांसह व्यापाऱ्यांनाही बसत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही या ट्रॅफिक जॅममध्ये अडकत आहेत. तातडीच्या उपचारांची गरज असताना रुग्णवाहिकांना वाट काढण्यासाठी २० ते ३० मिनिटे एकाच जागी उभे राहावे लागत आहे. एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नागरिकांची मागणी
“शहरातील ट्रॅफिकची समस्या आता असह्य झाली आहे. प्रशासनाने तात्काळ वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी आणि खर्डा चौक ते बीड रोडचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.






