ZP Election : राहू -खामगाव गटात बंडखोरी डोके वर काढणार ; घेतले तर तुमच्याबरोबर, नाहीतर.. प्रस्थापितांना इशारा

प्रभात वृत्तसेवा
राहू – राहू-खामगाव जिल्हा परिषद गटाची नव्याने पुनर्रचना झाल्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. जुन्या राहू-खामगाव गटातील पाणवली,टाकळी ,पाटेठाण व देवकरवाडी या सारखी गावे खामगाव गणात गेल्याने तसेच नाथाची वाडीसारखी नवखी गावे खामगाव गणाला जोडल्यामुळे अनेकांचा अंदाज चुकला आहे. तर अनेकांना ही एक संधी वाटत आहे. ही गावे पूर्वीच्या राहू गणात होती, परंतु तालुक्यात वाढलेल्या गट संख्येमुळे फेररचना होऊन हा बदल झाला आहे.
जुन्या राहू-खामगाव गटावर आमदार राहुल कूल यांचे वर्चस्व आहे, एक गट व दोन गणांपैकी एक गट व एका जागेवर आमदार कुलांचे वर्चस्व होते व नवीन गट रचनेत कोणाचे वर्चस्व राहील राहील, याचा अंदाज जाणकार लोकांना देखील येत नाही. परंतु हे सर्व होत असताना राहु गटात राहु व खामगाव ही दोन मोठी लोकसंख्या असलेली गावे आहेत व दोन्ही गावे ही गणाचे प्रतिनिधित्व करणारी आहेत.
त्या मुळे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व हे दोन्ही राजकीय पक्षाकडून या दोन्ही गटातच मिळणार, हेही तेवढेच खरे. परंतु राजकीय परिस्थिती पाहिली तर बंडखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे. बंडखोरी करण्यामध्ये जुने जाणतेच जास्त असण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही गटांकडून नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
नाहीतर तुमच्याशिवाय..
निवडणुका अनेक दिवस लांबल्याने इच्छुक हे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्या मुळे “अभी नही तो कभी नही”अशी परिस्थिती आहे.नवीन गट रचना झाल्यामुळे अनेक मंडळींना वेगळाच अंदाज आला आहे. त्यामुळे अनेक तरुण मुलांच्या डीपीला व स्टेटसला जुन्या व इच्छुक उमेदवारांचे फोटो ठेवून “अभि नही तो कभी नाही”असे लेबल लावून फोटो ठेवले जात आहेत व विशेष म्हणजे या फोटोवर कोणत्याही वरिष्ठ पातळीवरील नेत्याचा फोटो नसतो. म्हणजे थोडक्यात आम्हाला सगळे मार्ग मोकळे आहेत. “घेतले तुम्ही तर तुमच्याबरोबर, नाही तर तुमच्या शिवाय”असा संदेश ही मंडळी देत आहेत.
दोन्ही गटांकडून चाचपणी..
राहू-खामगाव गटात सध्याची परिस्थिती वेगळी आहे. गटामध्ये सर्वसाधारण जागेमुळे अनेक इच्छुक आहेत. तर यातील काहीजण हे दोन्ही गटांकडून चाचपणी करत आहेत. गावकी भावकी व पाहुणे रावळे यांच्या माध्यमातून दबाव गट तयार करून दोन्ही गटाकडून अंदाज घेतला जात आहे.परंतु विधानसभे वेळी घेतलीली बचावात्मक भूमिका ही इच्छुकांची दोन्ही गटाकडून अडचणीची ठरत आहे. परंतु जरी अशा भूमिका घेऊन एका गटाकडून तिकीट मिळविले तरी मतदार अशा या प्रवृत्तीला स्वीकारतील की नाही याची चर्चा चौकाचौकात आहे.
छोट्या गावांना संधी कधी?
राहू जिल्हा परिषद गटात आत्तापर्यंत राहू किंव्हा खामगाव गटातच जिल्हा परिषदेची उमेदवारी ही दोन्ही बाजूने दिली गेली आहे. जरी दोन्ही गावांची लोकसंख्या जास्त असली तरी इतर गावांच्या सहकार्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही हे वास्तव आहे.त्या मुळे छोट्या गावांना देखील संधी मिळणे गरजेचे आहे. त्याचा परिणाम बंडखोरी रोखण्यावर होईल.





