ZP Election Result : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात भाजपला मिळालेल्या यशावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीचीच सत्ता येणार हे आता अतिशय स्पष्ट झाले आहे. ६० ठिकाणी भाजप नंबर वन पक्ष आहे, तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “अतिशय सकारात्मक कल समोर आला आहे. भाजपने २०१७ चा स्वतःचा विक्रम मोडला आहे. २०१७ मध्ये भाजपला १४१ जागा मिळाल्या होत्या, तर यंदा निकाल पूर्ण होईपर्यंत २३६ जागा मिळाल्या आहेत. निवडणूक काळात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मी स्वतः प्रचार न करण्याचा निर्णय घेतला.” मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील सहकारी पक्षांचे अभिनंदन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही कौतुक केले. “राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि योग्य कारभार करू,” असे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, “सरसंघचालक जे विधान करतात त्यावर आम्ही भाष्य करत नाही. त्यांची वक्तव्ये दिशादर्शक असतात. विरोधी पक्ष केवळ माध्यमांत दिसतो, जनतेमध्ये नाही. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल.” दरम्यान, मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने जिल्हा परिषदांमध्ये पहिला क्रमांक कायम राखला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही १०० हून अधिक जागा जिंकत मजबूत कामगिरी केली आहे.