Rupali Chakankar : “तुम्ही तक्रार करा, न्याय देण्याची जबाबदारी आमची !” रुपाली चाकणकरांचे महिलांना आश्वासन

Rupali Chakankar : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरून टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज नाशिकमध्ये आयोजित ‘महिला आयोग आपल्या दारी’ या जनसुनावणीत सहभाग घेत महिलांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.
तक्रारींचा पाठपुरावा करा, न्याय आमची जबाबदारी : चाकणकरांचा ठाम पवित्रा
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या या जनसुनावणीत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं की, “तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, तुम्हाला न्याय मिळवून देणं ही महिला आयोगाची जबाबदारी आहे.”
बालविवाह, हुंडा बळी, लैंगिक अत्याचारांविरोधात कठोर कायदे असूनही अंमलबजावणीत कमतरता असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण भागात अजूनही जन्म दाखल्यात फेरबदल करून बालविवाह घडवले जातात, हे दुर्दैवी वास्तव त्यांनी अधोरेखित केलं.
जनसुनावणीत महिलांनी थेट मांडल्या तक्रारी
या उपक्रमात महिलांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट उपस्थित राहून आपले प्रश्न महिला आयोगासमोर लेखी स्वरूपात मांडले. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या सायबर तक्रारींपासून ते ह्युमन ट्रॅफिकिंगपर्यंत अनेक गंभीर विषयांवर सुनावणी झाली.
“शिक्षण म्हणजे सुशिक्षितपणा नव्हे, मानसिकता बदलणं गरजेचं”
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “कायद्याचं अस्तित्व असूनही त्यातून पळवाटा शोधल्या जातात. मानसिकता बदलणं हे खऱ्या परिवर्तनासाठी अत्यावश्यक आहे.”
वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया
प्रकरणावर प्रश्न विचारल्यानंतर चाकणकर म्हणाल्या की, “पोलिसांनी दिरंगाई केली, याची चौकशी सुरू आहे. परिणय फुके प्रकरणाबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नव्हती,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महिलांच्या हक्कासाठी आयोग सज्ज असून, प्रत्येक जिल्ह्यात अशा जनसुनावण्या घेऊन महिलांना थेट व्यासपीठ दिलं जात आहे. तक्रारी ऐकून घेणं आणि त्यावर कठोर निर्णय घेणं, हे महिला आयोगाचं कर्तव्य असल्याचं रुपाली चाकणकर यांनी ठामपणे सांगितलं.





