प्रभात वृत्तसेवा पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून ३२ प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यातील कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची यादी तयार केली. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या विभागाने काय करायचे हे तीन महिन्यांपूर्वीच निश्चित करण्यात आले. त्यानंतरही कोंडी कायम असल्याने महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी थेट महापालिका आयुक्तांच्या समोरच कोंडीचे खापर एकमेकांवर फोडले.याप्रकरणी वादाची चिन्हे दिसताच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हस्तक्षेप करून कोंडी फोडणे हे एका विभागाचे काम नाही. कोंडीला महापालिकाही जबाबदार आहे आणि पोलीसही, असे सांगत वादावर पडदा टाकला. तसेच कोंडी सोडवायची असेल तर जबाबदारी एकमेकांवर न ढकलता दोन्ही विभागांनी निश्चित केलेली कामे करावीत, अशा सूचना देत अधिकाऱ्यांना सुनावले. शहरातील वाहतूक कोंडीबाबत आयुक्तांकडून बोलाविलेल्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला. बैठकीस अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., वाहतूक पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच महापालिकेच्या पथ, प्रकल्प आणि अतिक्रमण विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेचे आरोप.. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग होते, परंतु पोलिसांकडून सक्षमपणे कारवाई होत नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत रिक्षाथांबे आहेत. रस्त्यावरच वाहनं उभी असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. खासगी बसही रस्त्यावरच उभ्या असतात. पोलिसांनी नियमित कारवाई केल्यास कोंडी होणार नाही. अशा ठिकाणांची यादी देण्यात आल्यानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोप पालिकेने केला. पोलिसांचे आरोप.. चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत पथारी व्यावसायिक असून महापालिकेने पार्किंगचे फलक आणि रस्त्यांवर मार्किंग करणे आवश्यक आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खोदाई सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. पालिकेस वारंवार पत्र देऊनही ही कामे केली जात नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पालिकेने याकडे लक्ष दिल्यास कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे मत पोलिसांनी नोंदवले. “३२ रस्त्यांवर ८५ टक्के वर्दळ असते. त्यामुळे हे रस्ते कोंडीमुक्त करण्यासाठी अहवाल तयार केला आहे. त्यात २२ ठिकाणी कोंडी होते आणि त्यानुसार कोणत्या विभागाने काय करायचे हे निश्चित केले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. शहरातील कोंडी हा गंभीर विषय असून या विषयावर वाद न घालता प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी कोंडी फोडण्यावर महापालिकेचा भर आहे.” -नवल किशोर राम, महापालिका आयुक्त