BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की ठाकरे बंधूंना? असदुद्दीन ओवैसींनी स्पष्टच सांगितलं….

BMC | Asaduddin Owaisi – हैदराबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत AIMIM चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक निकालांवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. महापालिकेत कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा आघाडी करायची की नाही, याचा निर्णय हा केवळ पक्षपातळीवरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले, “महापालिकेत कोणत्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय AIMIM पक्षच घेईल. कोणत्याही नगरसेवकाला स्वतःहून असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पक्षाच्या निर्णयाविरोधात कोणी पाऊल उचलल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.”
सर्व नगरसेवकांना दिला स्पष्ट इशारा.!
मुंबई महापालिकेत भाजप किंवा उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, “जर कोणी AIMIM ला तोडण्याचा प्रयत्न केला, तर पक्ष स्वतः पुढील दिशा ठरवेल. कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला जाणार नाही.” AIMIM ला फोडण्याचे प्रयत्न झाले, तर जनताच अशा शक्तींना धडा शिकवेल, असा इशाराही ओवैसी यांनी दिला.
त्यांनी बिहारचे उदाहरण देत सांगितले की, तेथेही पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र जनतेने अशा प्रयत्नांना सडेतोड उत्तर दिले. AIMIM चे नगरसेवक कुठेही जाणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि पक्षाच्या मंजुरीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन सर्व नगरसेवकांना केले.
मुंबई महापालिकेत AIMIM चे 8 नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय औरंगाबादमध्ये 33, तर अमरावती आणि अकोल्यामध्येही AIMIM ने यश मिळवले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वॉर्डमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या नगरसेवकांनी विजय मिळवल्याचाही उल्लेख ओवैसी यांनी केला.
महाराष्ट्रातून AIMIM चे एकूण 125 नगरसेवक निवडून आल्याबद्दल ओवैसी यांनी राज्यातील मतदारांचे आभार मानले. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.





