Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’चा अंतिम अंक उद्या? महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठा भूकंप; शिंदेंचा पुढचा प्लॅन पाहा…
ठाकरेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली

Operation Tiger – महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळजनक घडामोडी आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखलेल्या ऑपरेशन टायगरचा अंतिम अंक शुक्रवारी मुंबईत रंगणार असून, जयपूर येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले शिवसेनेचे ६ बंडखोर खासदार गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होत आहेत.
गोरेगावमधील वेस्टीन हॉटेलमध्ये या खासदारांच्या मुक्कामाची गुप्त सोय करण्यात आली असून, शुक्रवार, १९ जूनला होणाऱ्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
नेस्को सेंटरमध्ये शुक्रवारी होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमाच्या अगदी शेजारीच हे हॉटेल असल्याने सर्व खासदारांना एकाच छताखाली आणून त्यांना सुरक्षितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गुरुवारी संध्याकाळी ६ नंतर या सर्व खासदारांचे मुंबईत आगमन होणार असून, त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाकरेसेनेने संसदीय पक्षाची बैठक बोलावून आणि व्हीप बजावून या खासदारांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र, ९ पैकी ६ खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवून एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडखोर खासदारांच्या या निर्णायक पावलामुळे आता शिवसेना ठाकरेसेना आक्रमक झाली आहे.
पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी ठाकरेसेना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे धाव घेणार आहे. मात्र, या ठाकरेसेनेकडे दोन-तृतीयांश बहुमत असल्याने कायदेशीर लढाईत बंडखोर खासदार वरचढ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही बातमी वाचा : Shivsena : मोठी बातमी ! तारीख ठरली; ‘या’ दिवशी संसदेकडून ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात सामील झाल्याची होणार अधिकृत घोषणा
या राजकीय भूकंपाची तीव्रता पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईसह संबंधित खासदारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे ६ खासदार अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे ठाकरेसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व खासदार संजय जाधव यांच्याकडे असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, आता या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण जुळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






