Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार? आजच्या निर्णायक बैठकीकडे लक्ष
Manoj Jarange : जरांगे यांचे राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचे आवाहन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अमारण उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला असून याचदरम्यान त्यांनी मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.
सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचे संकेत दिल्यानंतर जरांगे समर्थकांसह आज 12 सप्टेंबर रोजी मुंबईला जाण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आज आंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्यात मुंबईतील आंदोलनाची रुपरेषा जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हायकोर्टाने कालच परवानगी शिवाय मुंबईत आंदोलन न करण्यास बजावले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदूच्या सणादरम्यान शिवरायांचे मावळे आंदोलन करणार नाहीत, अशी भावनिक साद घातली आहे. त्याचवेळी आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत धडक देणार असल्याचा ठाम इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
‘आम्ही कायद्याला धरून अर्ज केला तर परवानगी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. गृहमंत्रालयाने परवानगी दिली पाहिजे. सरकारने सुद्धा नियम पाळले पाहिजेत. पण सरकार स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठे समजत आहे. न्यायालयापेक्षा मोठे समजत आहे. संविधानाचे उल्लंघन करत आहे. परवानगी सुद्धा सरकार देईल आणि उपोषण सुद्धा आझाद मैदानावर होईल’, असे जरांगे यांनी शुक्रवारी म्हटले. यावेळी जरांगे यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. आजच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
१५ पैकी १२ मागण्या पूर्ण केल्याचा दावा
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला असला, तरी जरांगे पाटील यांनी अद्याप आपला संघर्ष थांबवलेला नाही. याबाबत आता सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून पाठिंबा वाढत असून लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी परिसरातील लातूर-बार्शी मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंगा तालुक्यातील निटूर येथे लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा :






