Mamata Banerjee : ममता बॅनर्जी दिल्लीच्या राजकारणात जाणार? चर्चांना उधाण; अखेर युसूफ पठाणने व्हिडिओ शेअर करत स्पष्टचं सांगितलं
Mamata Banerjee : रिपोर्टमध्ये सौरभ गांगुली यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर मोठा वादा निर्माण झाला.

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी यांच्या संभाव्य खासदारकीच्या चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये ममता बॅनर्जी या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी बरहामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांबाबतचे सत्य समोर आले आहे.
एका रिपोर्टनुसार, बरहामपूरचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार युसूफ पठाण यांना जागा रिक्त करण्यासाठी राजी करण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जी यांनी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला होता. ममतांनी युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र, हा प्रस्ताव युसूफ यांनी नाकारल्याचेही वृत्तात म्हटले होते.
या दाव्यांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, टीएमसी खासदार युसूफ पठाण यांनी हे सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी जे काही दावे करण्यात आले आहेत, त्याविषयी सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा : LPG Cylinder Price : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
सौरभ गांगुली यांनीही दिले स्पष्टीकरण
रिपोर्टमध्ये सौरभ गांगुली यांनी मध्यस्थी केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर मोठा वादा निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण देत कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदेशवहनात किंवा चर्चेत आपण सहभागी नसल्याचे स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी आपल्यामार्फत कोणताही संदेश पाठवलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, युसूफ पठाण यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याचा किंवा जागा रिक्त करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले. सोशल मीडियावर पडताळणी न करता अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. काही खासदार आणि आमदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू असून, त्यामुळे बंगालच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : Dehuroad News : देहूरोड-निगडी मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; २ भुयारी मार्गांच्या कामाला लष्कराची मंजुरी






