Maharashtra Politics : …तरच एनडीएमध्ये या! भाजपने शरद पवार गटासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट? चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या एनडीएमध्ये प्रवेशाच्या चर्चांना वेग आला असतानाच, भाजपने या संदर्भात महत्त्वाची अट घातल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटाने एनडीएमध्ये सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत विलिनीकरण करावे, अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी प्रथम एकत्र यावे आणि त्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा निर्णय घ्यावा, अशी भाजपची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय, दोन्ही गटांचे विलिनीकरण झाल्यास केंद्र सरकारमध्ये दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळू शकते, अशीही माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू होती. त्यातच १४ जुलै रोजी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर महाविकास आघाडीत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती.या भेटीवर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राजकीय वर्तुळाचे लक्ष
दरम्यान, आता सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने ‘आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र या, त्यानंतरच एनडीएमध्ये प्रवेशाचा विचार होईल,’ असा संदेश दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत नेमका काय निर्णय होतो, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. वर्षा निवासस्थानी भेटींचा सिलसिला सुरू आहे.






