Ajinkya Rahane Poor Performance In Ranji Trophy : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून कसोटी संघाबाहेर आहे. रहाणेची इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेली नाही. त्याने नुकतेच सांगितले की, मला भारतासाठी 100 कसोटी सामने खेळायचे आहेत. रणजी ट्रॉफीतील त्याची कामगिरी पाहता त्याला पुनरागमनासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल असे दिसते. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्राफीमध्ये मुंबईकडून खेळताना रहाणेला सलग दोन डावांत खातेही उघडता आले नाही.
त्यामुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. त्याला संघात परतायचे आहे आणि भारतासाठी 100 कसोटी सामने खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे. मात्र रहाणेचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
रहाणे रणजी मोसमातील पहिल्या सामन्यात बिहारविरुद्ध खेळू शकला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला आंध्र प्रदेशविरुद्ध डावात फलंदाजीची संधी मिळाली. तो पहिल्या डावात खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. नितीश रेड्डीने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. मुंबईने हा सामना 10 गडी राखून जिंकला. अशा स्थितीत त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही.
त्यानंतर रहाणे आंध्रविरुद्धची कामगिरी विसरून तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. मोसमातील तिसऱ्या सामन्यात तो केरळविरुद्ध पहिल्या डावात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी बेसिल थम्पीने त्याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सलग दोन गोल्डन डकनंतर त्याच्या पुनरागमनाच्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत. याशिवाय तो टीम इंडियाच्या भविष्यातील प्लॅनमध्ये बसेल असंही चिन्ह दिसत नाही.
World Test Championship (2023-2025) : टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी मालिका महत्वाची…
अजिंक्य रहाणेला 2022 मध्ये खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाने ठरवले की आता त्यांना युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. मात्र, श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे संघात परतला. मात्र अवघ्या तीन कसोटीनंतर अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्याने रहाणेला संघातून वगळण्यात आले.
आता रणजी ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर अजिंक्य रहाणेची संघात पुनरागमन करण्याची शेवटची संधीही बंद झाली आहे. त्यामुळे रहाणेचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता कमीच आहे.
टीम इंडियाकडे आहेत पर्याय…
सध्या टीम इंडियाकडे मधल्या फळीत अनेक पर्याय आहेत. गेल्या दोन वर्षांपासून श्रेयस अय्यरचा पाचव्या क्रमांकावर प्रयत्न सुरू आहे. अय्यरने आतापर्यंत 12 कसोटीत एक अर्धशतक आणि एक शतक झळकावून 707 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत अय्यरला संधी मिळण्याची खात्री आहे. त्याचबरोबर केएल राहुलनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मधल्या फळीत खेळताना शतक झळकावले आहे. केएल राहुल इंग्लंडविरुद्ध खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संघाबाहेर…
यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी रहाणेची भारतीय संघात निवड झाली नव्हती. रणजी ट्राफीत सलग दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी राष्ट्रीय संघात बोलावले जाण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षी भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रहाणेने एकही कसोटी खेळलेली नाही. भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही. रहाणेने आतापर्यंत 85 कसोटी सामन्यांमध्ये 38.46 च्या सरासरीने 5 हजार 077 धावा केल्या आहेत. या काळात भारताच्या माजी कर्णधाराने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत.