औरंगाबाद – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड मारली आहे. ईडीचे १० अधिकारी ५ तासांहून अधिक वेळ राऊतांच्या घरी आहेत. राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून दुसरीकडे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. अशातच राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचे शिंदे गटातील आमदारांनी स्वागत केले आहे. तर दुसरीकडे भाजपसोबत जाताच शिंदे गटातील आमदारांवरील कारवाई का थांबवण्यात आली? असा सवाल ठाकरे यांच्या समर्थकांकडून उपस्थित करण्यात येतोय. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तीन दिवसीय नाशिक व औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री शिंदे शनिवारी दौरा अर्ध्यावर सोडून अचानक दिल्लीला रवाना झाले होते. ते रात्री उशिरा औरंगाबादला परतले. आज (रविवारी) ते परिसरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी शिंदे यांना राऊत यांच्यावरील कारवाईबाबत विचारण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र ‘इथे विकासकामांची मोठी कारवाई करायचीय’ असं म्हणत राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर बोलणं टाळलं. यामुळे एकीकडे बंडखोर आमदार या कारवाईचे स्वागत करताना दिसत असले तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र या विषयाला बगल दिली आहे.
राऊत यांच्यावरील कारवाईचा आनंद – संजय शिरसाट
“ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
बंडखोर गटाचे नेते रामदास कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी ईडी कारवाईवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत ही कारवाई खोटी असल्याचं म्हंटलं होत. कदम यांनी हाच धागा पकडत, राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, राज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.