Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार कधी पकडले जाणार?; काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारला सवाल

नवी दिल्ली – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला महिना होत आला आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
हे ऑपरेशन राबवल्यानंतर देशातून तसेच जगभरातून भारताचे कौतुक झाले. मात्र, पहलगाम हल्ल्याला महिना होत आला असताना, या हल्ल्यातील गुन्हेगार कधी पकडले जाणार, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेता जयराम रमेश यांनी मोदी सरकारला सवाल केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा सवाल केला आहे. रमेश म्हणाले की, या हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत. त्यांना आधी पकडायला हवे. महिना होत आला तरी त्यांची माहिती कशी मिळत नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील सगळे दहशतवादी मारले गेले तर एकाला ताब्यात घेतले होते. यामुळे जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित झाले होते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात याची माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ पाठवणे म्हणजे, मूळ घटनेपासून लक्ष दुसरीकडे भटकवण्याचा पंतप्रधान मोदी यांचा हेतू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलवत नाही, अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.
जिनांना क्लीन चिट कोणी दिली
यावेळी त्यांनी भाजप खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. जयराम म्हणाले, पाकिस्तानला ऑक्सीजन चीन देतो आहे. चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध देखील लढू शकत नाही.
तसेच जिनांना क्लीन चिट कोणी दिली, अशी विचारणाही त्यांनी केली. ही क्लीन चिट लालकृष्ण आडवाणी यांनी दिली, जसवंत सिंह यांनी जिनांची तारीफ केली होती. लाहोर बस यात्रा देखील अटल बिहारी वायपेयी यांनीच सुरू केली. नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याचेही ते म्हणाले.





