भाजप-ठाकरे युती कधी होणार? ठाकरेंसमोर नार्वेकरांचा प्रश्न अन् चंद्रकांत पाटलांनी मारला सिक्सर, म्हणाले “या सुवर्णक्षणाची…”

Uddhav Thackeray And Chandrakant Patil | मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि भाजपमधील जवळीक वाढल्याचे दिसत आहे. हिवाळी अधिवेशानादरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली होती. यानंतर राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यातच आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एक संवाद समोर आला आहे. ज्यात ते भाजप-ठाकरे युतीबाबत चर्चा करताना दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?
भाजपचे विले पार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट झाली. या भेटीदरम्यान विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना ‘मग युती कधी?’ असा प्रश्न विचारला.
यावर चंद्रकांत पाटील यांनी ‘मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय’ असं उत्तर दिलं. यावेळी उद्धव ठाकरे देखील तिथं उपस्थित होते.
त्यावेळी उद्धव ठाकरेंनी दोघांना विचारले, ‘काय कुजबुजताय?’ त्यावर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना म्हणाले की, मीच हेच म्हणत होतो, युती होईल माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल. त्यांच्या या उत्तराने सगळेच हसू लागले. यावेळी तिघांच्या चांगला संवाद रंगला होता. उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातला हा संवाद समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमधील भेट आणि आता पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या भेटीत उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात युतीची हसत खेळत झालेली चर्चा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा:
अहमद अल-शरा बनले सीरियाचे अंतरिम अध्यक्ष ; नेमके कोण आहेत अहमद अल-शरा ?





