एकनाथ शिंदेंच्या दिल्लीतील भेटीगाठी केव्हा वाढतात? संजय राऊतांनी सांगितलं कारण; ‘हा’ मोठा दावा करत म्हणाले…

Sanjay Raut : “जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात, गृहमंत्री अमित शाहांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात”, असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर लगावला. सर्वोच्च न्यायलयातील शिवसेनेचे प्रकरण हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेत मोदींना भेटले, असेही संजय राऊत म्हणाले.
काल अचानक शिवेसना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले होते. तब्बल दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. ही भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत शिंदेंनी पंतप्रधान मोदींकडे मुंबई आणि ठाणे महापालिकेसाठी काही मागण्या देखील केल्या असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
थेट भाष्य
या भेटीवर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्यात काहीही नाही, असे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी नुकतेच प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, या प्रश्नावर बोलताना भाष्य केले.
निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष….
मोदी आणि शाहांना शिंदेंची जमिनीवरील ताकद किती आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या विरुद्ध वापरुन घेतलं, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. अमित शाहांचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महापालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपात विलीन करावा लागेल. यात सत्य आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : अचानक एकनाथ शिंदेंनी PM मोदींची भेट का घेतली? आतली बातमी समोर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या





