“आम्हाला तर राहुल गांधी यांना…”; संजय राऊतांचं सर्वांत मोठं विधान; काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर लगावला सणसणीत टोला

Sanjay Raut : दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. दिवाळीत राजकीय फटाके फुटताना दिसत आहेत. महाविकासआघाडीतील काँग्रेस पक्ष्याचे नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे सोडा, पण उद्धव ठाकरेंसोबत देखील जाणार नसल्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत काँग्रेस पक्षाकडून अधिकृत पक्षाची कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, भाई जगताप यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीत फुट पडल्याचे बोलले जात असताना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत येणारी कोणतीही भूमिका घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी मांडली. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे. आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
ही लढाई लोकशाही….
आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी बोलू. मात्र, अद्याप या विषयावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे उगाच त्याच्यावर अकांडतांडव करण्याचे अर्थ नाही, असा सणसणीत टोला त्यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला. १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील मित्र पक्ष मोर्चा काढणार आहेत, यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असा सल्ला दिला.
आम्हाला तर काँग्रेसचा…
आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता. पण होऊ शकला नाही. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला, तेव्हा आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते, असे राऊतांनी सांगितले. त्यामुळे आमचे मन फार मोठे आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. हे महाशय मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसले आहेत? असा सवाल करत तुम्ही 27 महानगरपालिकेचे महापौर काँग्रेसचे करा. आम्हाला काही अडचण नाही.
काँग्रेसची तशी भूमिका नाही
महापौर हा मराठी मातीतला होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा महापौर मराठी असायला हवा हा मुद्दा उपस्थित केला. मनसेसाठी काँग्रेसला सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अशी कुठलीही चर्चा सुरू नाही. महाविकास आघाडीसमोर असा विषय आलेला नाही. इंडिया ब्लॉकच्या बैठकीत असा विषय नाही, काँग्रेसने तशी भूमिका घेतली नाही.
हेही वाचा : Beauty Skin: अंगणातील फक्त ४-५ पानं करतील कमाल! “७ दिवसांत त्वचा चमकेल”, जाणून घ्या सोपा घरगुती उपाय





