“हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही महात्मा गांधींना तर सोडले नाही मग…”; कर्नाटकमध्ये येडियुरप्पांसह भाजपाच्या तीन नेत्यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सध्या न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे उजव्या विचारसरणीच्या एका व्यक्तीने राज्यातील भाजपच्या तीन बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणासंदर्भात मंगळुरु पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या धर्मेंद सुरथकल यांनी हिंदू महासभेच्यावतीने वक्तव्य करताना या बेकायदेशीर बांधकामाविरोधात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेला विरोध केला होता. पत्रकार परिषदमध्ये सुरथकल यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि मंत्री शशिकला जोले यांच्याविरोधात वक्तव्य करण्यात आली.
१० सप्टेंबर रोजी मैसूरमधील नंजगगुड परिसरामधील एक मंदिर या कारवाईअंतर्गत पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता स्थानिकांनी त्याला विरोध केला. या प्रकरणासंदर्भात बोलताना सुरथकल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “जर आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी महात्मा गांधींना मारुन टाकलं तर मुख्यमंत्री, येडियुरप्पा आणि जोले यांना काय वाटतं आम्ही त्यांना सोडून देऊ काय?,” असे वादग्रस्त विधान सुरथकल यांनी केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारी मंगळुरुचे पोलीस आयुक्त एन. शशि कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुरथकल, राजेश पवित्रन आणि प्रेम पोलाली यांना हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष एल, के. सुवर्णा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. या तिघांविरोधात वेगवेगळ्या कलमांअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुवर्णा यांनी सुरथकल यांनी केलेल्या वक्तव्याशी हिंदू महासभेचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारने २९ सप्टेंबर २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामांना हटवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०१० साली दिलेल्या आदेशाचे पालन करत करावाई करत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे काम केले जात आहे. या संदर्भात वेळोवेळी न्यायालयामध्ये सुनावणीही झाली आहे.





