वायनाडमध्ये निसर्गाचा कहर ! आतापर्यंत 292 लोकांचा मृत्यू, अनेकजण अजूनही बेपत्ता

Wayanad Landslides । केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचा कहर झाल्याचे दिसून आले. याठिकाणी पावसाने भूस्खलन होऊन अनेक कुटुंब उद्धवस्त झालीत. मंगळवारी झोपेत असतानाच वायनाडमध्ये जमीन खचली. अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 292 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना वाचवण्याच बचाव पथकाला यश आलंय. अद्याप 29 मुलं बेपत्ता आहेत.
अत्यंत मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे वायनाडच्या डोंगराळ भागात भूस्खलन झालं होतं. या दुर्घटनेत किमान 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. अजून 240 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. लष्कराच्या वतीनं काही काळासाठी बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं. थोड्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी शोध आणि बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं. संततधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
राहुल गांधी, प्रियांका गांधी वायनाडमध्ये दाखल Wayanad Landslides ।
दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाडला पोहोचल्यात. यादरम्यान त्यांनी वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागांत उभारलेल्या विविध मदत शिबिरांनाही भेट दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मेपड्डी, वायनाड येथे या दुर्घटनेतील पीडितांची भेट घेतली. दोन्ही नेते सकाळी 9.30 वाजता कन्नूर विमानतळावर उतरले आणि त्यानंतर रस्त्यानं वायनाडला पोहोचले होते.
बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू Wayanad Landslides ।
वायनाडमधील भूस्खलनानंतर भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस-प्रशासन वेगानं बचावकार्य करत आहेत. बचाव कर्मचारी उद्ध्वस्त घरं आणि इमारतींमधील लोकांचा शोध घेत आहेत, मात्र आजूबाजूला ढिगारा साचल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लष्करानं विक्रमी वेळेत उभारला ब्रीज
केरळमधील वायनाड येथे झालेल्या भीषण आपत्तीनंतर भारतीय लष्कराने मदत आणि बचाव कार्याची कमान हाती घेतली आहे. गुरुवारी, सैनिकांनी विक्रमी वेळेत भूस्खलनाच्या ठिकाणाजवळील नदीवरील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले. वायनाडमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लष्कराचे जवान ‘भारत माता की जय’चा नारा देताना दिसत आहेत. भारतीय लष्कराकडून वायनाडमधील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने प्रथम आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली. काम पूर्ण झाल्यानंतर बांधकामात सहभागी असलेल्या लष्कराच्या जवानांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. पुलाच्या बांधकामामुळे आता जड वाहनांना दरड कोसळण्याच्या ठिकाणी नेता येणार आहे.





