Water Scarcity: शेतकरी हवालदिल! नीरा-भीमा नदीचे पात्र कोरडे, ‘या’ कारणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात
Water Scarcity: अवकाळीच्या फटक्यानंतर आता मान्सूनची हुलकावणी; नीरा आणि भीमा नद्या कोरड्या पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!

Water Scarcity – कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणार्या इंदापूर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण शिवार चिंतेच्या छायेत आले आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून शेतकर्यांच्या आशा-अपेक्षांवर निराशेचे सावट दाटले आहे. वाढती उष्णता, पाण्याची टंचाई आणि रखडलेल्या पेरण्यांमुळे तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही संकटाचे ढग दाटले आहेत.
इंदापूरच्या शेतीला जीवनदान देणार्या निरा आणि भीमा या नद्यांच्या पात्रातही यंदा पुरेशा पाण्याचा ठावठिकाणा नाही. नदीकाठच्या भागातही जलसाठा घटल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते.
उभी पिके, फळबागा आणि शेतीमालाचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी सावरत असतानाच आता पावसाने दडी मारल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. बियाणे, खते, मजुरी आणि सिंचनाचा वाढलेला खर्च यामुळे शेतकर्यांची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा संपुष्टात आला असून भूजल पातळीही झपाट्याने खालावत आहे. अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे.
तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आणि इतर जलसाठे कोरडे पडल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. सध्या शेतातील ऊस, मका आणि हिरवा चारा यांसारखी पिके वाढत्या उष्णतेमुळे करपू लागली असून पानांवर पिवळेपणा दिसून येत आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. पशुधनासाठी हिरव्या चार्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
खते विणयाणांची विक्री मंदावली
खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, तूर, उडीद, मूग आणि मका या पिकांच्या पेरण्या अद्याप मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करणे धोक्याचे असल्याने बहुतांश शेतकर्यांनी पेरणी पुढे ढकलली आहे. परिणामी कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे व खतांचा मोठा साठा पडून असून विक्री मंदावल्याचे कृषी सेवा केंद्र चालक सांगत आहेत. दरम्यान, जोरदार वारे, वाढती उष्णता आणि ढगाळ वातावरण असूनही पाऊस होत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
बाजारपेठेचे अर्थचक्रही पावसावर
शेतीवर आधारित व्यापारी, मजूर, वाहतूकदार, दुग्ध व्यवसाय, पशुपालक आणि ग्रामीण बाजारपेठेचे संपूर्ण अर्थचक्रही पावसावर अवलंबून असल्याने पावसाचा विलंब हा केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका देत आहे. त्यामुळे जलसंधारण, पाणी नियोजन, सिंचन व्यवस्था, पीकविमा आणि नुकसानभरपाईबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.





