Warkari Safety: वारकर्यांची सुरक्षितता खरोखरच धोक्यात? जेजुरी दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह
Warkari Safety: सोलापूर आणि सासवड महामार्गावर अवजड वाहनांची हुल्लडबाजी; विसाव्याच्या ठिकाणी पालखी पोहोचेपर्यंत वाहतूक पूर्णपणे रोखण्याची वारकऱ्यांची विनंती.

Warkari Safety – जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडीत ट्रक घुसल्याने तीन वारकर्यांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आषाढी वारीतील वारकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे.
मात्र या प्रवासात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीची प्रचंड गर्दी, अपुरे बॅरिकेडिंग, अंधार, अनधिकृत फलक, निसरडे रस्ते आणि अपुर्या सुविधा यामुळे वारकर्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे-सासवड मार्गाने तर संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे-सोलापूर महामार्गाने मार्गक्रमण करते. यंदा दिवेघाट परिसरातील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन न झाल्याचा फटका पालखी सोहळ्याला बसल्याची चर्चा होती.
पालखी मार्गावर इतर वाहनांनाही प्रवेश मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आणि पालखीला सासवड मुक्कामी पोहोचण्यास मोठा विलंब झाला. अनेक ज्येष्ठ वारकर्यांनी एवढा उशीर यापूर्वी कधीच झाला नसल्याचे सांगितले. पुणे-सोलापूर महामार्गावरही वारकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेवाळेवाडी परिसरातील खड्डे, धुळीचे साम्राज्य, तुटलेली संरक्षक जाळी, सेवा रस्त्यांवरील साचलेले पाणी आणि कचरा यामुळे पायी चालणार्या वारकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
पालखी पुढे सरकताच मागून वाहने सोडली जात असल्याने वारकर्यांच्या समवेतच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचेही दिसून आले. काही ठिकाणी दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनचालकांनी वेगाने वाहने चालवल्याने धोका अधिक वाढल्याचे वारकर्यांनी सांगितले. काही रुग्णवाहिकाही रुग्ण नसतानाही वेगाने जात असल्याचे चित्र दिसून आले. वारकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चालत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
शहर-ग्रामीण हद्दीतील समन्वयाचा अभाव?
वारकर्यांच्या म्हणण्यानुसार, पालखी कवडीपाट टोलनाक्याजवळ पोहोचताच पुणे शहर पोलिसांकडून वाहने सोडली जातात. त्यानंतर पालखी पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश करत असताना टोलनाका, कुंजीरवाडी आणि आसपासच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. यंदाही पुण्याकडून येणार्या वाहनांनी अनेक रांगा केल्याने आणि सोलापूरकडील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याने वारकरी अडकून पडले.
पालखी दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी किंवा मुक्कामी पोहोचल्यानंतरच इतर वाहने सोडावीत, तसेच पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनामध्ये अधिक प्रभावी समन्वय साधावा, अशी मागणी वारकर्यांकडून करण्यात येत आहे.






