Velhe News – वेल्हे तालुक्यातील ऐतिहासिक तोरणा किल्ल्याच्या कुशीत वसलेले बार्शीचा माळ हे गाव आजही स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या या गावात दळणवळणाची साधने, वीज आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असतानाही ग्रामस्थांनी गेल्या २० वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा अत्यंत निष्ठेने जपली आहे. या ऐतिहासिक गावात जाण्यासाठी अनेक दशकांपासून केवळ पायवाटच उपलब्ध होती. दोन तासांची पायपीट करून जीवनावश्यक वस्तू डोक्यावर वाहून न्याव्या लागत असत. अशा बिकट परिस्थितीत श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष ह.भ.प. मोहन महाराज शिंदे यांनी २० वर्षांपूर्वी येथे हरिनामाची पेरणी केली. कोणतेही मानधन न घेता आळंदीतील विद्यार्थी दरवर्षी या गावात येऊन सप्ताह पार पाडतात. मोहन महाराज शिंदे यांनी या गावच्या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, ज्याला यश येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४२ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे आज किमान दुचाकी व लहान वाहने गावात पोहोचू शकत आहेत. तोरणा किल्ला यंदाचा अखंड हरीनाम सप्ताह २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, आळंदीतील ४० बाल वारकरी बसने थेट गावात पोहोचले आहेत. या कार्यक्रमात ह.भ.प. पांडुरंग महाराज राजूरकर व ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. मृदुंग व गायनासाठी कल्याणी शिंदे, साहिल उत्तेकर, प्रथमेश वायकर, पृथ्वीराज कराळे यांनी साथ दिली. ह.भ.प. शिवाजी महाराज पुराणिक यांचे मार्गदर्शन तर मोहन महाराज शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.रस्त्यासाठी रामेश्वर महाराज शास्त्री, मच्छिंद्र महाराज कुंभार, बाळकृष्ण महाराज दसवडकर यांसह अनेक महाराजांनी परिश्रम घेतले. मात्र, आजही गावात रुग्णवाहिका, आरोग्यसेवा आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिकांना उपचारासाठी डोंगरदऱ्या ओलांडून जीव मुठीत धरून चालावे लागते. स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही या दुर्गम भागातील मानवी जीवाचे मोल प्रशासनासाठी शून्य आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.