मुंबई : कॉंग्रेस पक्ष पुढील महिन्यात होणारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्थानिक नागरी मुद्द्यांवर लढवेल आणि मतदार भाजपच्या धार्मिक अजेंड्याला बळी पडणार नसल्याचे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, महायुती सरकारने महानगरपालिकेमध्ये नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत काही विशिष्ट कंत्राटदार आणि उद्योगपतींसाठी नागरी निधी वळवला किंवा त्याचा गैरवापर केला आहे. काँग्रेस मुंबईच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या भविष्यासाठी निवडणूक लढवेल. प्रशासकाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला. रहिवाशांना चांगले रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छ हवा, शिक्षण आणि आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले. भाजपने अविभाजित शिवसेनेसोबत जवळपास २५ वर्षे महानगरपालिकेवर राज्य केले. आता गेल्या तीन वर्षांपासून भाजपच्या नेतृत्वातील सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत ही नागरी संस्था चालवली जात आहे. या काळात बीएमसीच्या तिजोरीचा गैरवापर करण्यात आला. भाजप मतदारांचे धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शहराच्या मुद्द्यांवर लढवली गेली पाहिजे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्धच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न उघड झाला आहे. भाजप विरोधी नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला.