Vanrai : पर्यावरण शिक्षणात कृती, प्रयोग अन् निरीक्षणाला प्राधान्य ; वनराईची शिक्षक कार्यशाळा उत्साहात
Vanrai:

Vanrai: विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित शिकवताना पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि प्रयोगांना अधिक महत्त्व द्यायला हवे. खेळण्यांच्या माध्यमातून शिकविल्यास मुलांना अवघड संकल्पनाही सहज समजतात, असे पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता यांनी सांगितले.
वनराईत आयोजित पर्यावरण शिक्षण विषयक शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत त्यांनी टाकाऊ आणि सहज उपलब्ध वस्तूंमधून तयार केलेल्या पन्नासहून अधिक शैक्षणिक खेळण्यांची प्रात्यक्षिके सादर केली.
कागद, स्ट्रॉ, रबर ट्यूब, बाटल्यांची झाकणे, जुनी वर्तमानपत्रे अशा साध्या वस्तूंमधून त्यांनी विज्ञानातील अनेक संकल्पना उलगडून दाखवल्या. शिक्षकांनीही ही खेळणी हाताळून त्यामागील विज्ञान समजून घेतले. अनुभवातून शिकविण्याची ही पद्धत शिक्षकांना विशेष भावली. त्यामुळे डॉ. गुप्ता यांचे सत्र कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले.
दुसऱ्या सत्रात भारतीय हवामान विभागाच्या (IMD) शास्त्रज्ञ डॉ. आरती बंडगर यांनी एल निनो आणि ला निना या हवामान घटनांचा भारतीय मान्सूनवर होणारा परिणाम सोप्या भाषेत स्पष्ट केला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये हवामान साक्षरता विकसित करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्राची क्षीरसागर यांनी शाळा जैवविविधता नोंदवही तयार करण्याची प्रक्रिया आणि तिचे शैक्षणिक महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेविषयी निरीक्षणाची सवय आणि संवेदनशीलता विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेतील आणखी एक आकर्षण म्हणजे प्रीती लकडे आणि अशोक लकडे यांनी उभारलेले खडक, खनिजे तसेच शंख-शिंपल्यांचे प्रदर्शन. शंभरहून अधिक नमुन्यांची वैशिष्ट्ये त्यांनी शिक्षकांना समजावून सांगितली. भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक यांनी खडक व खनिजांची निर्मिती, त्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि मानवी जीवनाशी असलेले नाते यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी वनराईचे सचिव यांनी पद्मभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या प्रेरणेतून वनराईच्या पर्यावरण शिक्षण उपक्रमांची सुरुवात झाली असून तोच वारसा आजही पुढे नेला जात असल्याचे सांगितले. पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी वर्षभर शाळांमध्ये राबविता येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता मुळे यांनी केले. विनायक गार्डे यांनी आभार मानले. या कार्यशाळेत पुणे जिल्ह्यातील ७० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.





