Vadodara Accident : महिलेचा मृत्यू, चार जण जखमी…; गुजरात अपघातावर जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत !

Janhvi Kapoor | Vadodara Car Crash : नुकतंच गुजरातमधील वडोदरा येथून एक हृदयद्रावक बातमी आली, ज्यामुळे सर्वांनाच राग आला. रात्रीच्या वेळी एका भरधाव कारने पाच जणांना धडक दिली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ही कार २० वर्षांचा रक्षित चौरसिया चालवत होता, ज्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रतिक्रिया आली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने वडोदरा येथील दुःखद रस्ते अपघाताचा तीव्र निषेध केला आहे आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा कारीबाग परिसरात हा अपघात झाला. याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत.
आरोपी रक्षित चौरसिया (२०) हा सुमारे १२० किमी/ताशी वेगाने कार चालवत होता. अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि तो पादचाऱ्यांना धडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर तो गाडीतून उतरताच त्याने अनेक वेळा “आणखी एक फेरी” असे ओरडले, यावरून स्पष्ट होते की त्याला त्याच्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नव्हता. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
जान्हवी कपूरने व्यक्त केला राग :
अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून या भीषण अपघातावर आपला राग व्यक्त केला. तिने लिहिले, ‘हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. कोणीतरी असे काही करून सुटू शकते, मग तो दारू पिलेला असो वा नसो, असा विचार करणे घृणास्पद आहे. जान्हवीची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा भारतात रस्ते अपघातांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे आता या घटनेवर अनेक जण आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
रक्षित चौरसिया यांनी एअरबॅगला दोष दिला :
माध्यमांशी बोलताना, रक्षित चौरसिया यांनी दारू पिल्याचा नकार दिला असून, अपघातासाठी खड्डे आणि एअरबॅग्ज जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला, ‘चौकाजवळ एक खड्डा होता आणि तो ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना माझी कार माझ्या समोरील स्कूटरला धडकली. त्याच क्षणी एअरबॅग उघडली, ज्यामुळे माझी दृष्टी पूर्णपणे बंद झाली आणि अपघात झाला. मात्र अपघात पाहणाऱ्यांनी रक्षितच्या युक्तिवादावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे.
पोलिसांचा तपास सुरूच :
अपघातानंतर काही तासांनी पोलिसांनी रक्षित चौरसियाला अटक केली आणि तो मद्यधुंद होता की नाही हे शोधण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली. पण वैद्यकीय अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. या अपघातानंतर, पुन्हा एकदा भारतात वाहतूक नियम कडक करण्याची आणि निष्काळजी वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे.






