Vadgaon Maval: जिथे जनता दरबार तिथेच दुरवस्था; शासकीय विश्रामगृहात मूलभूत सुविधांचा अभाव
Vadgaon Maval: महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

वडगाव मावळ : नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनता दरबार भरवला जातो, मात्र या जनता दरबारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचे चित्र वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पाहायला मिळत आहे.
विविध शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच लोकप्रतिनिधींचे कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी आयोजित केले जातात. आमदार सुनील शेळके यांच्याकडून आयोजित करण्यात येणारा जनता दरबारही याच ठिकाणी भरविला जातो. मात्र याठिकाणी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिक विविध शासकीय कामे, समस्या आणि तक्रारी घेऊन प्रशासनासमोर मांडण्यासाठी येतात. या कार्यक्रमांना मावळ तालुक्याच्या विविध भागांतून नागरिक उपस्थित राहतात. अनेकदा नागरिकांना आपली समस्या मांडण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते.
Pimpri News: ‘महापालिका ठरतेय अपयशी एमआयडीसीकडे जबाबदारी द्या’
अशा वेळी स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय विश्रामगृहाचा वापर सार्वजनिक स्वरूपाच्या विविध कार्यक्रमांसाठी केला जात असताना तेथे आवश्यक मूलभूत सुविधा असणे अपेक्षित आहे.
मात्र स्वच्छतागृहाच्या अभावामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना बाहेर जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही समस्या गंभीर ठरत आहे. वयस्कर नागरिकांना स्वच्छतागृहासाठी दूर जावे लागणे त्रासदायक ठरते. लहान मुलांसह कार्यक्रमाला येणाऱ्या कुटुंबांचीही मोठी गैरसोय होते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कार्यक्रमांना महिलांची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध असणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहाची सुविधा असेल तर त्याची नियमित स्वच्छता, पाणीपुरवठा आणि देखभालही तितकीच महत्त्वाची आहे. शासकीय विश्रामगृहात विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची नियमित ये-जा असते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Pune District : श्री कपर्दिकेश्वरचरणी लाखो भाविक
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनता दरबार भरविणे महत्त्वाचे आहे. मात्र, त्या नागरिकांना किमान मूलभूत सुविधा मिळणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आगामी कार्यक्रमांपूर्वी शासकीय विश्रामगृहात स्वच्छतागृहाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था करण्याची मागणी
स्वच्छतागृहासोबतच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणीही होत आहे. जनता दरबारासारख्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत असल्याने पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
कार्यक्रमापूर्वी सुविधा उपलब्ध करा
शासकीय विश्रामगृह हे मावळ तालुक्यातील महत्त्वाचे प्रशासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे ठिकाण आहे. त्यामुळे भविष्यात येथे आयोजित होणाऱ्या जनता दरबारासह इतर कार्यक्रमांचा विचार करून कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे.
पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि नियमित स्वच्छता या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Satara: झेडपी सीईओंच्या दालनाबाहेर उपोषणाचा सदस्यांचा इशारा, सौ. मनीषा फडतरे आक्रमक!





