उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांचा राजीनामा; भाजप आमदारांची आज महत्वाची बैठक

देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शनिवारी भाजप आमदारांची बैठक होणार आहे. दरम्यान, राज्यपाल आणि तिरथ सिंह यांच्यात काही मिनिटांतच मर्यादित औपचारिक बैठकीत राज्यपालांनी मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांना नवीन मुख्यमंत्री निवडला जाईपर्यंत आपल्या पदावर कायम रहाण्यास सांगितलं.
राजीनामा दिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सिंह यांनी, की राज्यपालांकडे राजीनामा देऊन आलो आहे. घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाले होते. यामुळे मला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं योग्य वाटलं. तसेच, मी माझ्या केंद्रीय नेतृत्वाचा आभारी आहे. नेतृत्वानं मला वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. मी मनापासून पंतप्रधान मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो. कोरोनाची लागण झाल्यामुळे अधिक वेळ मिळाला नाही.
जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात तिरथ सिंह रावत म्हणाले, की ” संविधानाच्या कलम 164-अ नुसार मुख्यमंत्र्याने 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.”
राजीनामा देताना उत्तराखंडचे भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, “ही चूक नाही कारण कोविडची परिस्थिती नसती तर निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या असत्या. घटनात्मक मंडळाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आदर करणं गरजेचे आहे. अशा परिस्थितीत अनेकदा निवडणुका घेण्यात आल्या आहेत मात्र कोविडच्या परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करायला हवे.
याआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत सुबोध उनियाल, अरविंद पांडे आणि आमदार राजेश शुक्ला हेदेखील उपस्थित होते. याशिवाय पत्रकार परिषदेत मुख्य सचिव ओम प्रकाश, मुख्य सल्लागार शत्रुघ्न सिंह हे देखील उपस्थित होते. सीएम तिरथ यांनी आपली कामगिरी मीडियासमोर सांगितली आणि बर्याच घोषणा केल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन मौन बाळगले.




