UPSC Answer Key : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा महत्त्वाचा निर्णय ; आता उत्तरतालिकेसाठी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेच्या उत्तरतालिका अर्थात अन्सर कीज् आता परीक्षेनंतर तात्काळ जाहीर केल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान यूपीएससीने ही भूमिका स्पष्ट केली. या निर्णयामुळे देशभरातील लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.आतापर्यंतच्या प्रचलित पद्धतीनुसार यूपीएससी संपूर्ण परीक्षा प्रक्रिया म्हणजेच सुमारे एक वर्ष पूर्ण झाल्यावरच अंतिम निकालानंतर उत्तरपत्रिका, गुण आणि कट-ऑफ जाहीर करत असे.
यामुळे जे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू शकले नाहीत, त्यांना त्यांच्या चुकांचे विश्लेषण किंवा अचूक मूल्यांकन करण्याची संधी मिळत नसे. मात्र, आयोगाच्या या नवीन भूमिकेमुळे ही प्रतीक्षा आता संपणार आहे.सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आता परीक्षेनंतर काही दिवसांतच तात्पुरती उत्तरतालिका (अन्सर कीज् ) प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना आक्षेप नोंदवण्यासाठी विशिष्ट मुदत दिली जाईल.
आक्षेप नोंदवताना योग्य पुरावे अथवा अधिकृत संदर्भ देणे बंधनकारक असेल. सर्व आक्षेपांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत पडताळणी केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका तयार केली जाईल आणि याच अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे निकालाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू करण्याचा आयोगाचा मानस असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
उमेदवारांना दिलासा..
यूपीएससीचा हा निर्णय परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याच्या दिशेने एक मोठे आणि सकारात्मक पाऊल मानले जात आहे. यामुळे उमेदवारांना केवळ त्यांच्या कामगिरीचे तात्काळ विश्लेषण करता येणार नाही, तर आयोगाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरील त्यांचा विश्वासही अधिक दृढ होण्यास मदत होईल. अनेक वर्षांपासून उमेदवारांकडून केली जाणारी ही मागणी पूर्ण झाल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या वर्गात आनंदाचे वातावरण आहे.


