Ujani Dam Bridge: उजनीवरील पुलाला ‘या’ बड्या नेत्याचे नाव देण्याची मागणी; इंदापूर तालुक्यातून नवा प्रस्ताव
Ujani Dam Bridge: उजनी जलाशयातून होणारा जीवघेणा प्रवास संपणार; अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुलाचे काम प्रगतीपथावर.

Ujani Dam Bridge – उजनी जलाशयावर उभारला जात असलेला महत्त्वाकांक्षी शिरसोडी–कुगाव पूल हा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा विकासाचा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, या पुलाला (स्व) अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी इंदापूर तालुक्यातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव यांना जोडणाऱ्या या पुलामुळे दोन्ही तालुक्यांतील दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे.
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाची मागणी इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत शहा तसेच इंदापूरच्या व्यापारी वर्गाने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी प्रशासकीय स्तरावर तातडीने निर्णय घेत पुलाला मंजुरी मिळवून दिली. त्यांच्या पुढाकारामुळे सध्या पुलाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. सध्या इंदापूरहून करमाळ्याकडे जाण्यासाठी टेंभुर्णीमार्गे सुमारे ६५ ते ७० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
मात्र पूल सुरू झाल्यानंतर हे अंतर सुमारे ४५ ते ५० किलोमीटरवर येणार असून वेळ, इंधन आणि वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे. या पुलाचा सर्वाधिक फायदा शिक्षण, व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला होणार आहे. करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना इंदापूरमधील शैक्षणिक संस्थांमध्ये ये-जा करणे अधिक सोयीचे होईल. इंदापूरमध्ये उच्च शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. पुलामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
दळणवळण, सुरक्षितता, शिक्षण, व्यापार, शेती आणि ग्रामीण विकास या सर्वच अंगांनी हा पूल ऐतिहासिक ठरणार असून, या विकासकामामागे (स्व) अजितदादा पवार यांची दूरदृष्टी आणि निर्णायक भूमिका होती, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे या पुलाला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, अशी मागणी आता इंदापूर तालुक्यात जोर धरू लागली आहे.
जिवघेणा संघर्ष –
सध्या करमाळा आणि इंदापूर तालुक्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना उजनी जलाशयातून अनधिकृत बोटींचा आधार घेत जीवघेना प्रवास करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांत बोटी बुडाल्याने निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. काही वर्षांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे बोट उलटून एकाच कुटुंबातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली होती. या दुर्घटनांमुळे सुरक्षित पुलाची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवत होती.
आर्थिक उलाढाल वाढणार-
याशिवाय करमाळा तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्यांमध्ये गाळपासाठी येतो. पुलामुळे ऊस वाहतुकीसह इतर कृषीमालाची ने-आण अधिक जलद आणि कमी खर्चात होईल. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळून व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे.





