UGC-NET: “मोदीजी, बघा तुमच्या NTA ने पुन्हा काय केलं?” ; UGC-NET मधील गोंधळावरून राहुल गांधींची टीका
UGC-NET: राष्ट्रीय परीक्षा संस्थेने रविवारी UGC-NET जून २०२६ परीक्षेचे वेळापत्रक बदलणार आहे असे जाहीर केले होते. त्यासोबतच ही पुनर्परीक्षा केवळ तीन पेपर्ससाठी असेल असेही सांगितले होते.

UGC-NET: राष्ट्रीय परीक्षा संस्थेने रविवारी UGC-NET जून २०२६ परीक्षेचे वेळापत्रक बदलणार आहे असे जाहीर केले होते. त्यासोबतच ही पुनर्परीक्षा केवळ तीन पेपर्ससाठी असेल असेही सांगितले होते. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या पेपर्सचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, ते जाहीर करण्यात आले आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत UGC-NET च्या गोंधळावर जोरदार भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले, “मोदीजी, बघा तुमच्या NTA ने पुन्हा काय केले आहे. समाजशास्त्र, इंग्रजी आणि वाणिज्य विषयांच्या UGC-NET परीक्षा २२ ते ३० जून दरम्यान घेण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांनंतर, NTA ने तिन्ही परीक्षा रद्द केल्या, कारण त्यांनी चुकीच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या आणि जुनेच प्रश्न पुन्हा विचारले होते.”
NTA च्या चुकीची शिक्षा देशातील विद्यार्थ्यांनी भोगली UGC-NET:
ज्या हजारो उमेदवारांनी वर्षानुवर्षे परिश्रमपूर्वक तयारी केली आहे, अर्ज भरले आहेत, शुल्क भरले आहे आणि दूरच्या परीक्षा केंद्रांवर प्रवास केला आहे, त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता सप्टेंबरमध्ये त्यांना हे सर्व पुन्हा करावे लागेल. एनटीए चूक करते, पण त्याचे परिणाम देशातील विद्यार्थ्यांना भोगावे लागतात.
“मी कोटा, डेहराडून आणि प्रयागराजमध्ये हेच सांगितले होते आणि मी ते सांगतच राहीन. ही आता शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही. हे केवळ पैसा आणि श्रमाचा अपव्यय करणारे साधन बनले आहे. ते तुमचे पैसे, तुमची वर्षे, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेते आणि त्याबदल्यात तुम्हाला नोकरीसुद्धा देत नाही. एनटीए अजूनही खऱ्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीये: परीक्षेपूर्वी हे पेपर फुटले होते का?”
मोदी सरकारवर निशाणा साधला UGC-NET:
“मोदी सरकारच्या प्रत्येक संस्थेप्रमाणे, एनटीए आपली चूक कधीच मान्य करत नाही. इतर फुटलेल्या पेपर्सप्रमाणेच, मला खात्री आहे की या प्रकरणात कोणालाही जबाबदार धरले जाणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असायला हवे होते, शेवटचे नव्हे. एनटीएच्या सर्वोच्च नेतृत्वालाही जबाबदार धरले पाहिजे.”असे म्हटले आहे.
सप्टेंबरमध्ये पुन्हा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांगायचे आहे: यात तुमचा दोष नाही. पंतप्रधान मोदींनी अशी व्यवस्था निर्माण केली आहे, जी योग्य परीक्षाही घेऊ शकत नाही आणि मग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच दोष देते. तुमची मौल्यवान वर्षे चोरली जात आहेत आणि जोपर्यंत पंतप्रधान मोदी या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.






