प्रभात वृत्तसेवा पुणे – पत्रकार म्हणून टिळक, आगरकर यांची नावे घेतो. मात्र, आज ती पत्रकारिता राहिली आहे का? चुकीचे काम करणाऱ्या सरकारला तुमचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्याची हिंमत आत्ताच्या पत्रकारांमध्ये आहे का? असा प्रश्न शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे कर्तव्य पत्रकारांनी बजाविले पाहिजे. तसेच आजच्या अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ठाकरे यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यासह खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते.पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुण्याला विद्येचे माहेरघर ओळखले जातं की, जात होते. आता माहेर घरे सगळी बिल्डरांची झाली आहेत असे सांगून ते म्हणाले,आत्तापर्यंत आमचे पुण्याकडे दुर्लक्ष झाले. युती आणि आघाडीचे बळी ठरलो. मात्र, पुणेकरांसाठी पुण्यामध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने कामाला लागेल. आपला विकास विनाशाकडे चालला नाही ना? याचा विचार आपण केला पाहिजे. घरे नुसती बांधतोय, पण सुविधा कुठे आहेत ? आज मुंबई, पुण्याचा श्वास वाहतुक कोंडीत कोंडला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत लढायचे का? स्वतंत्र याबाबत स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात घेऊ. हरामखोरांना उत्तर देत नाही.. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. भाजपने २०१७ मध्ये मध्ये दिलेली कर्जमाफी अजूनही चालू आहे. जनता अडचणीत असताना मदत करणारे सरकार पाहिजे. सरकार अडचणीत असताना मदत करणारे सरकार नको. यावेळी शिंदे गटातील नेत्यांविषयी प्रश्न विचारला असता, गद्दार, नमक हराम आणि हरामखोरांना मी उत्तर देत नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशिर्वाद देणारे हात खूप महत्वाचे आहे, असे असंख्या हात माझ्या पाठीशी आहेत, असेही ते म्हणाले. “एकत्र यायचे नसते तर आम्ही एकत्र आलोच नसतो. मात्र, आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले. मराठी माणूस एकत्र झाला तर काय घडू शकते याची त्यांना प्रचिती आहे.” -उध्दव ठाकरे – प्रक्षप्रमुख, शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष