फक्त आमच्या असूयेपोटीच गरळ ओकली जात आहे उदयनराजे भोसले यांची टीका

सातारा -आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. सार्वजनिक कामात बाप दाखवा नाहीतर श्राध्द कर अथवा एक घाव दोन तुकडे करण्याची भूमिका घेण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. लोकहित लक्षात घेऊन आम्ही एखादा प्रश्न घेऊन कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहिती दिली तर त्यात वावगं काहीच नाही. ते कधी सार्वजनिक प्रश्न घेऊन कोणाकडे जात नसतील आणि जरी गेले तरी त्यात स्वार्थाचा मतितार्थ अधिक असेल तसेच त्यांना कोणी मंत्रीमहोदय भेटीसाठी कदाचित उभं करत नसतील.
या कारणामुळेच उदयनराजेंना कोणताही मंत्री कसा इतका वेळ देतो, मला तसा वेळ कोणीच का देत नाही अशी सल त्यांना बोचत आहे. त्यांनी आमच्या असूयेपोटीच गरळ ओकलेली आहे. त्याला फार महत्व देत नाही, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. भ्रष्टाचार आणि स्वार्थांध विचाराने बरबटलेल्यांनी भ्रष्टाचाराबाबत आरोप करणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल. कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे.
बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. बॅंकांतील घामाचा पैसा मागण्यासाठी यांच्या घरासमोर याचना करणाऱ्या व्यक्तींना सातारकरांनी पाहिलेले आहे. यांनीच प्रचंड प्रमाणात आणि सगळीकडे जबर भ्रष्टाचार केला आहे. काविळ झाली की सर्व जग जसे पिवळे दिसते, तसे सगळेच भ्रष्टाचार करतात असे त्यांना वाटत असावे. त्यांच्या या विकलांगतेची किव वाटते अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.





