Uday Samant: ‘राहुल गांधी संसदेत बसतात हीच भाग्याची गोष्ट!’; उद्योगमंत्री उदय सामंत यांची जोरदार टीका
Uday Samant: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याचे समर्थन; संजय राऊतांच्या वक्तव्याला किंमत देण्याची गरज नसल्याचा पलटवार.

Uday Samant – काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत बसतात आणि सध्या संसदेच्या अधिवेशनला उपस्थित राहतात, हीच खूप भाग्याची गोष्ट मानावी लागेल, असा टोला राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरून टीका केली. जी व्यक्ती जंतरमंतरवर आंदोलनासाठी न जाता थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात जाऊन लोकांना बोलावून घेते,
त्यांनी देशहित आणि सुरक्षेच्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत जो कडक कायदा केला, तो आज पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठीही लागू होतो, असे सामंत म्हणाले. विद्यार्थ्यांचे आंदोलन केंद्र अथवा राज्य सरकारने नाकारलेले नाही. परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, यासाठी सरकार कठोर कायदा करत आहे.
मात्र, या आंदोलनात सहभागी झालेले राजकीय पक्ष हे स्वत:च्या अस्तित्वासाठी तेथे गेले. महाराष्ट्रातील जनतेने नाकारलेले लोक आणि पक्षदेखील तेथे जाऊन तरुणांना चिथावत होते. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन धर्मेंद प्रधानांचा राजीनामा घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विरोधात सरकारची भूमिका नाही, हे दिसून येते, असे सामंत म्हणाले.
शहा यांच्या दौऱ्याचे समर्थन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जनरल डायर संबोधून त्यांच्या पुणे दौऱ्यावर टीका करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविषयी बोलताना सामंत म्हणाले, की आज याला शिवी, उद्या त्याला शिवी द्यायचा उद्योग ते सकाळपासूनच करतात. त्यांच्या म्हणण्याला एवढी किंमत द्यायची गरज नाही. याउलट लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा पुरस्कार सोहळा पुण्यात होणे, ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा येत असतील, तर विरोधकांनी त्यात अनावश्यक राजकारण करण्याची गरज नाही.
विलिनीकरण हा त्यांचा प्रश्न
राष्ट्रवादीचे विलिनीकरण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणात कोणाचे विलिनीकरण होणार, याची मलाही उत्सुकता आहे. विलिनीकरण झाले म्हणजे एखाद्या पक्षाचे महत्त्व कमी होत नाही. शरद पवार मोदींना का भेटले, याचे उत्तर तेच देऊ शकतील. शिवसेना नेते एकनाथ शिंदे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहेत. शिंदे काय करू शकतात, हे देशाने ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून पाहिले आहे, असे सामंत म्हणाले.






