Uday Samant : निकालाबाबत न्यायालयाबाहेर दावा करणे म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंत याची टीका
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणावर भाष्य करताना न्यायालयाबाहेर निकालाबाबत दावे करणे म्हणजे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असा इशाराही (Uday Samant) त्यांनी दिला.

Uday Samant : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नसला, तरी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे घेतील, असे स्पष्ट करतानाच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भरत गोगावले यांनीच रायगडचे पालकमंत्री व्हावे, अशी आपली स्पष्ट इच्छा व्यक्त केली.
तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणावर भाष्य करताना न्यायालयाबाहेर निकालाबाबत दावे करणे म्हणजे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असा इशाराही (Uday Samant) त्यांनी दिला.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत बोलताना सामंत (Uday Samant) म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेला लवकरच अंतिम स्वरूप मिळेल, अशी अपेक्षा असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. मात्र, भरत गोगावले यांच्याकडेच रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सामंत (Uday Samant) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले. कोणतेही आंदोलन दडपशाहीने मोडून काढण्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीही घेतली नाही, असे ते म्हणाले. शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले तसेच समाजाच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले, असा दावा त्यांनी केला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीबाबत बोलताना सामंत (Uday Samant) यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात आवश्यक ती सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली असून पक्षाचे वकील प्रभावीपणे बाजू मांडत आहेत. त्यामुळे न्यायालय योग्य आणि न्याय्य निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना न्यायालयाबाहेर निकाल आपल्या बाजूनेच लागणार असल्याची वक्तव्ये करणे म्हणजे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून तो न्यायालयाचा अवमान असल्याचे सामंत म्हणाले.
ठाकरे गटावर निशाणा साधताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा दाखला दिला. आम्हाला ‘गद्दार’ म्हणणारे आज महाराष्ट्राच्या राजकारणात सातव्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांनी १०३ जागा लढवून केवळ २० जागांवर विजय मिळवला, तर आमच्या शिवसेनेने ६० जागा जिंकल्या. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले असल्याचा दावा उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.






