कल्याण : आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील फोडाफोडीचे राजकारण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन्ही गटांना एकाच वेळी मोठा धक्का बसला असून, भाजपने दोन प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात घेतले आहे. हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. या पक्ष प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे शिवसेना (शिंदे गटाचे) विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय जोशी आणि शिवसेना (UBT) माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीररित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा सोहळा भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमावेळी युतीच्या शक्यतेवर बोलताना जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी “ये पब्लिक है, सब जानती है” असे म्हणत नाव न घेता शिवसेना नेत्यांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच, “महापौरपद भाजपचेच राहणार” असा दावा करून भाजपची ताकद वाढली असल्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये “ज्यांच्याकडे जास्त नगरसेवक, त्यांचाच महापौर” या सूत्रावरून आधीच तणाव आहे. या प्रवेशांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्हींमध्ये खळबळ उडाली असून, कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, दोन्ही शिवसेना गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या फोडाफोडीमुळे महायुतीतील अंतर्गत कलह वाढला असून, केडीएमसी निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची अपेक्षा आहे. या घटनेने स्थानिक राजकारणात नवीन वळण घेतले असून, पुढील काळात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.