Newasa: आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त संस्थानच्या मंडळाने मंगळवारी (दि. २४) मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पालखी मार्गावरील भाविकांसाठी सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वारकऱ्यांसाठी या सुविधांची केली मागणी – या बैठकीत पालखी मार्गावर पुरेशा पाण्याची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य शिबिरे, निवारा, रस्ते सुधारणा आणि पोलीस बंदोबस्त या महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. या सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात जेणेकरून पालखी सोहळा सुलभ व सुरक्षित होईल, असे संस्थानच्या विश्वस्तांनी यावेळी सुचवले. उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही दिले मागणीपत्र – विश्वस्त मंडळाने विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही पालखी सोहळ्याबाबतचे मागणीपत्र सादर केले. पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे आणि संस्थानचे विश्वस्त व वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी यावेळी पालखी सोहळ्याबाबत सविस्तर माहिती दिली. हेही वाचा – Shirur: पिंपरखेडच्या तुकाईदेवी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; 180 बैलगाड्यांच्या स्पर्धेत दाभाडेंनी पटकावला ‘घाटाचा राजा’ किताब नेवाशाला आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठाचा दर्जा द्यावा — विश्वस्त जाधव संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासे पुण्यभूमीत आंतरराष्ट्रीय ज्ञानपीठाचा दर्जा देऊन मराठी भाषेचे ज्ञानपीठ उभारण्याची महत्त्वाची मागणी विश्वस्त कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. या बैठकीस आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार मोनिकाताई राजळे, संस्थानचे महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामनाथ महाराज झिंजुर्के, ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री, विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संदीप खराड यांच्यासह तालुक्यातील प्रमुख वारकरी मंडळी उपस्थित होती.