Pakistan Train Attack – बलुचिस्तान प्रांतात प्रवासी रेल्वेचे अपहरण करणाऱ्या बलुच बंडखोरांवर सुरक्षा दलांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज ३० दहशतवादी ठार झाले. तर ओलीस ठेवलेले रेल्वेतील १९० प्रवाशांची सुटका करण्यात आली. बलुच बंडखोर आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमधील धुमश्चक्री बुधवारी दुपारपर्यंत सुरू होती. अपहरण करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेस रेल्वेचा ताबा मिळवल्याचा दावा सुरक्षा दलांकडून करण्यात येतो आहे. मात्रसुरक्षा दलांची कारवाई अद्यापही सुरू असल्याचे समजते आहे. क्वेट्टा येथून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसमधून ४०० प्रवासी प्रवास करत होते. बलुच दहशतवाद्यांनी काल स्फोटकांचा स्फोट घडवून रेल्वेमार्ग उडवून दिले होते. त्यामुळे रेल्वे रुळावरून घसरली होती. त्यानंतर रेल्वेचे अपहरण करण्यात आले होते. बलुच लिबरेशन आर्मीने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली होती. रेल्वेतील ६ सुरक्षा रक्षकांना ठार केल्याचेही सांगितले गेले. मात्र याला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून काल कोणाच दुजोरा मिळू शकला नव्हता. रेल्वे अपहरणाचे वृत्त समजताच बलुचिस्तान प्रांताच्या सरकारने आपत्कालिन कारवाई सुरू केली. पाक लष्कर आणि फ्रॉन्टिअर कॉर्प्सने मिळून संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती. क्वेट्टापासून १६० किलोमीटर अंतरावर गुद्दालर आणि पिरू कुनरी दरम्यानच्या बोगद्याजवळ रेल्वेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आले. सर्व प्रवाशांची सुरक्षित सुटका होईपर्यंत ही कारवाई सुरू राहिल, असे बलुचिस्तानच्या प्रवक्त्याने सांगितले. या अपहरण नाट्यानंतर प्रवाशांबाबतची माहीती देण्यासाठी पाकिस्तान रेल्वेने पेशावर आणि क्वेट्टा येथे संपर्क कक्ष सुरू केला होता. एकूण किती दहशतवाद्यांचा सहभाग हे अनिश्चित आतापर्यंत ३० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर कारवाईदरम्यान जखमी झालेल्या ३० जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान मुख्य इंजिनमधील दोन चालक आणि आठ सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. या अपहरणामध्ये नेमक्या किती दहशतवाद्यांचा सहभाग होता, हे समजू शकलेले नाही. यापैकी काही दहशतवादी सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून आपल्या श्रेष्ठींच्या संपर्कात होते. यापुर्वी बीएलएकडून बलुचिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांवर, पोलीस चौक्या आणि विदेशी नागरिकांवर हल्ले केले जात होते. मात्र बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रथमच एखाद्या रेल्वेचे अपहरण केले आहे. उलट-सुलट दावे आणि प्रतिदावे महिला आणि बालकांना सोडून दिल्याचा दावा अपहरणकर्त्यांनी केला होता. मात्र या सर्वांची सुटका सुरक्षा दलांनी केली असे पाकिस्तानचे गृहराज्य मंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले. दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोटकांनी भरलेली जॅकेट घातली होती आणि महिला आणि मुलांना आपल्या भोवती बसवले होते. प्रवाशांचा वापर मानवी ढालीसारखा केला गेल्यामुळे ही कारवाई खूपच काळजीपूर्वक करावी लागली, असे सुरक्षा सूत्रांनी म्हटले आहे. सुरक्षा दलांनी रेल्वेला वेढा घातला होता. मात्र दहशतवाद्यांनी महिला आणि बालकांना ओलीस ठेवल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत, असे जिल्हा पोलीस अधिकाऱी राणा मुहम्मद दिलावर यांनी म्हटले होते. रेल्वेमध्ये ४ ते ५ सरकारी अधिकारी देखील होते, असेही त्यांनी म्हटले होते.