Traditional Dahi Handi: डीजे अन् बक्षिसांचा झगमगाट नाही! वारंगवाडीने जपली जुनी आणि अनोखी गोकुळाष्टमीची परंपरा
Traditional Dahi Handi: वाढत्या व्यापारीकरणाला फाटा देत मावळातील वारंगवाडीत पारंपरिक पद्धतीने साजरी झाली गोकुळाष्टमी; एकोपा आणि संस्कृती जपणे हेच मुख्य ध्येय.

Traditional Dahi Handi – महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सणांचे वाढते व्यापारीकरण आणि उत्सवांमधील ध्वनिप्रदूषण यामुळे पारंपरिक सणांचे स्वरूप बदलत आहे. मात्र, मावळातील वारंगवाडी येथे आजही गोकुळाष्टमीची जुनी आणि अनोखी परंपरा जपली जात आहे. येथे दहीहंडी हा केवळ चढाओढीचा किंवा बक्षिसांसाठी आयोजित केला जाणारा कार्यक्रम नसून, गावातील एकोपा, मैत्री आणि संस्कृतीची देवाणघेवाण घडवून आणणारा उत्सव मानला जातो.
गावातील चार ठिकाणी असलेल्या कानिफनाथांच्या मंदिरामध्ये जन्माष्टमीच्या दिवशी ही परंपरा ताशा वाजवत मोठ्या उत्साहात पार पडते. कृष्णजन्माच्या निमित्ताने पुरुष मंडळी अंगात ‘वारं’ घेऊन धार्मिक विधी आणि उत्सवात सहभागी होतात. विशेष म्हणजे ही परंपरा केवळ मोठ्यांपुरती मर्यादित न राहता लहान मुलांनाही त्याची माहिती देऊन पुढील पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे.
गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच गावातील विविध ठिकाणी साशन काठ फिरवली जाते. देवाचा गुलाल उधळत, पारंपरिक पद्धतीने जल्लोष केला जातो. गावातील तीन ठिकाणी बांधलेल्या हंड्या फोडण्याचा कार्यक्रमही यावेळी पार पडतो. उत्सवाच्या वेळी प्रत्येक काठीवर आणि प्रत्येक घरातून पाणी अर्पण करण्याचीही अनोखी प्रथा आहे. ‘वारं’ घेतलेल्या व्यक्तींना अखेरीस चाबूक देऊन त्यांचा ‘वारं’ शांत केलं जाते.
या धार्मिक आणि पारंपरिक विधींमध्ये गावातील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. या उत्सवात पुरुषांचा सहभाग मोठ्या उत्साहाचा असतो, तर महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण सोहळा पाहतात. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भोजन तयार करतात. त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते. येथे विजेत्यांना बक्षिसे दिली जात नाहीत; मात्र अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जातो.





