Gill WTC Record : शुबमन गिलने रचला इतिहास! डब्ल्यूटीसीत ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिलाच कर्णधार
Gill WTC Record : कर्णधार गिलने ५० धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक खास पराक्रम केला आहे.

Shubman Gill Historic WTC Record 1000 Runs In Single Edition 3000 Test Runs Milestone : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा कर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) आपल्या नेतृत्वासह फलंदाजीतही नवा इतिहास रचला आहे. कोलंबोच्या एसएससी मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३०० धावा उभारल्या. कर्णधार गिलने संयमी फलंदाजी करत ५० धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) एकाच आवृत्तीत १,००० हून अधिक धावा करणारा गिल हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
अवघ्या १० कसोटी सामन्यांत १,००० धावा; दिग्गजांना टाकले मागे –
शुबमन गिलने डब्ल्यूटीसी २०२५-२७ या हंगामाची सुरुवात भारताचा नियमित कर्णधार म्हणून इंग्लंड दौऱ्यापासून केली होती. कर्णधारपदाची धुरा सांभाळताना त्याने अवघ्या १० कसोटी सामन्यांतील १७ डावांत ६८.२६ च्या उत्कृष्ट सरासरीने १,०२४ धावा कुटल्या आहेत, ज्यामध्ये ५ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. डब्ल्यूटीसीच्या एकाच हंगामात १ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार तर ठरलाच, शिवाय रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्यानंतर हा पल्ला गाठणारा एकूण चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
कसोटीत ३००० धावा पूर्ण; ठरला चौथा सर्वात युवा भारतीय फलंदाज –
🚨 Milestone Alert 🚨
3⃣0⃣0⃣0⃣ runs and counting in Test Cricket for Captain Shubman Gill!
Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/D4Xsx7putR
— BCCI (@BCCI) August 23, 2026
या अर्धशतकी खेळीदरम्यान शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमधील आपल्या ३,००० धावांचा टप्पाही यशस्वीरीत्या पार केला. वयाच्या अवघ्या २६ वर्षे ३४९ दिवस या वयात त्याने ही कामगिरी केली असून, कसोटीत सर्वात जलद ३ हजार धावा करणारा तो चौथा सर्वात युवा भारतीय ठरला आहे. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर (२३ वर्षे २२८ दिवस) अव्वल स्थानी असून, वीरेंद्र सेहवाग (२६ वर्षे १५७ दिवस) दुसऱ्या तर दिलीप वेंगसरकर (२६ वर्षे २६३ दिवस) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या दिवसअखेर भारताची स्थिती मजबूत; पडिक्कलचे शतक –
सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार गिलने देवदत्त पडिक्कलच्या साथीने डावाला आकार दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ बाद ३०० धावांची समाधानकारक धावसंख्या उभारली होती. पडिक्कलचे शतक (११७) आणि कर्णधार गिलच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाने कोलंबो कसोटीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असून, गिलच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात त्याचे कौतुक होत आहे.





