Police Bharati : पोलीस भरतीत घोटाळा? १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे…; वडेट्टीवार आक्रमक
Police Bharati : सुप्रिया सुळेंची सखोल चौकशीची मागणी

Police Bharati : पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षेत १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातून जसेच्या तसे विचारण्यात आले आहेत. २ मे रोजी झालेल्या लेखी परीक्षेत घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे म्हंटले जात आहे. राखीव पोलीस बलाच्या (गट ५, दौंड) शिपाई पदाच्या भरतीत समोर आला आहे.
विशेष म्हणजे हे प्रश्न विचारताना प्रश्नांची क्रमवारी व पर्यायांतही बदल केला नेसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होऊ लागली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी
या प्रकाराबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनीही नाराजी दर्शवत चौकशीची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या ,”राज्य राखीव पोलीस दला’च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात.
आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल ८५ प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी.”
‘राज्य राखीव पोलीस दला’च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही… pic.twitter.com/nGKFesHe5j
— Supriya Sule (@supriya_sule) May 5, 2026
;
विजय वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, तरुणांच्या आयुष्याशी राज्य सरकार खेळ करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हंटले की, “राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला.
तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे.”
पुढे ते म्हणाले, “पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच.
३९७७ मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे.
महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी… pic.twitter.com/lwPlgoz4fX
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 5, 2026
नेमका काय आहे आरोप ?
शनिवारी (२ मे) रोजी एसआरपीएस – या गटाची शंभर गुणांची लेखी परीक्षा पार पडली. ही परीक्षा इंदापुरातील एका महाविद्यालयात झाली. प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता, असे एकूण १०० प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. त्याच शंभर प्रश्नांची क्रमवारी मागे-पुढे करून ए, बी, सी आणि डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले होते. या परीक्षेतील चारही प्रश्नपत्रिकेत ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या सराव संचातून उचलण्यात आले होते.
या परीक्षेतील प्रश्नसंच ए मध्ये अगदी त्या सराव संचातील क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायांनुसार जसेच्या तसे प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच काही उमेदवारांनी प्रश्नपत्रिका फुटली असल्याचा संशयही व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी केली आहे.
हेही वाचा:
Kiara Advani : अखेर त्या चर्चांवर कियाराने मौन सोडलं; दोनच शब्दांची पोस्ट शेअर करत म्हणाली…





