आ. बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
उंब्रज – आमदार, खासदार होण्यासाठी कारखाना काढायचा ट्रेड निर्माण झाला आहे. अशांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही देणेघेणे नाही. यशवंत विचारांचा वारसा घोणशी गावाने नेहमी जपला असून गावकऱ्यांनी विकासासाठी एकत्र येऊन मतभेद बाजूला सारुन सहकाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
घोणशी, ता. कराड येथे जानुबाई मंदिरा शेजारील सभामंडपाचे भूमिपूजन, आरसीसी वेटींगशेडचे भूमिपूजन व संरक्षक भिंतीचे उद्घाटन आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव सर्वगोड, राष्ट्रवादीचे कराड उत्तर अध्यक्ष देवराज पाटील, लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष सुभाषराव पाटील, जयंत पाटील, अरुण पाटील, मानसिंगराव जगदाळे, जि. प. सदस्या विनिता पलंगे, सौरभ पाटील, सागर पाटील, जशराज पाटील, सुहास बोराटे, प्रणव ताटे, संचालक माणिकराव पाटील, संजय पिसाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील पुढे म्हणाले, घोणशी गावाचा कराड दक्षिणेत समाविष्ट झाला असला तरी या गावाने यापूर्वी केलेले सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्य पूर्व काळानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब त्यानंतर पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पाठीशी राहीले. घोणशीकरांनी यापुढेही विकासासाठी मतभेद बाजूला सारून एकत्र यावे. विधानसभा जवळ आल्या आहेत. त्यामुळे आश्वासने व भूलथापांना बळी पडू नका, असेही ते म्हणाले.