Top 15 News : जरांगेंची शिंदेंविरोधातही आघाडी, राहुल गांधींचा काँग्रेससाठी ‘मास्टरप्लॅन’ आणि ‘अडकित्ता’मुळे सई ताम्हणकर पुन्हा चर्चेत, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : मनोज जरांगे आणि सरकारमधील संघर्ष सुरू असतानाच आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधातही आघाडी उघडली आहे.

राज्याकडे पावसाने पाठ फिरवली;
८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पर्जन्यखंड
Top 15 News : राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं आहे. तांत्रिक निकषानुसार, चार विभागांतील १९ जिल्ह्यांच्या ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड नोंदवला गेला आहे. यापैकी २३ तालुक्यांमध्ये तब्बल ३० दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस गायब आहे. पुण्यातील शिरूर आणि अहिल्यानगरमधील कर्जत येथे सर्वाधिक ३८ दिवसांचा पर्जन्यखंड नोंदवला गेला. बारामती, दौंड, पुरंदरसह अनेक तालुक्यांतही ३७ दिवस पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस, बाजरी आणि कडधान्य पिकं हातातून जाण्याची भीती वाढली असून, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
जरांगेंची शिंदेंविरोधातही आघाडी!
SEBCच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप
मनोज जरांगे आणि सरकारमधील संघर्ष सुरू असतानाच आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधातही आघाडी उघडली आहे. शिंदेंनी आपल्याला शह देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून SEBCचा मुद्दा पुढे आणल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. मात्र, शिंदेसेनेनं हे आरोप फेटाळले असून, हे जरांगेंचे गैरसमज असल्याचं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. दरम्यान, पुण्यात SEBC आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सरकारने मराठा समाजाला SEBCमधून 10 टक्के आरक्षण दिलंय. त्यामुळे जरांगेंच्या कुणबी दाखल्यांच्या मागणीला शह देण्यासाठी ही रणनीती आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका!
‘लाडकी बहीण’सह ‘या’ योजनांची आंतरराष्ट्रीय दखल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची आता थेट ब्रिटिश संसदेत दखल घेतली जाणार आहे. 9 आणि 10 सप्टेंबरला लंडनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांत शिंदेंना तीन पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ सन्मान मिळणार आहे. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ या योजनांची विशेष दखल घेण्यात आली आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शिंदे मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा!
११ ते २७ सप्टेंबरपर्यंत टोलमाफीचा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. मुंबई-बंगळूर महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ आणि संबंधित मार्गांवर ही सवलत लागू असेल. अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा पास किंवा स्टिकर दिला जाणार असून, तो परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य असेल. एसटी बसनाही टोलमाफी मिळणार असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
राज्यात पुन्हा पावसाची हजेरी!
नंदूरबार-धुळ्यात विजांच्या कडकडाटासह सरींचा अंदाज
पावसाने सध्या राज्यात थोडी उघडीप घेतली असली, तरी काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. तापमानाचा पारा ३३ अंशांच्या पुढे गेल्याने अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहू शकतं. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून, बहुतांश भागांत पावसापेक्षा उघडीपच राहण्याचा अंदाज आहे.
ठाण्यातील डेटा सेंटरवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल;
‘प्रकल्प इथून हद्दपार करू, आमचं सरकार आलं तर!’
ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. “डेटा सेंटरला विरोध नाही, पण शहराच्या मध्यभागी नको,” असं म्हणत त्यांनी प्रकल्पाला विरोध केला. २२ मजली या प्रकल्पामुळे २४ तास ९० डेसिबलचा आवाज, मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर आणि उष्णता वाढण्याचा दावा त्यांनी केला. तब्बल ५ लाख लिटर डिझेल साठवण्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केला. ठाण्यातील हजारो झाडं तोडली जाणार असल्याचाही आरोप त्यांनी केला. “आमचं सरकार आलं तर हा प्रकल्प इथून हद्दपार करू,” असा इशारा देत ठाकरेंनी ठाण्यासाठीचा आवाज शांत होणार नसल्याचं स्पष्ट केलं.
दुष्काळसह अन्य प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक;
‘तुमसे ना हो पायेगा’ म्हणत सरकारविरोधात आंदोलन Top 15 News :
मराठवाड्यातील दुष्काळ, रखडलेले विकास प्रकल्प आणि अतिवृष्टीच्या अनुदानावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सरकारने ‘कुंभकर्णाच्या झोपेचं सोंग घेतलंय’असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. धाराशिवमध्ये दानवे, आमदार कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती असूनही सरकारकडून केवळ विकासाच्या पोकळ गप्पा सुरू असल्याचा आरोप दानवेंनी केला. ‘तुमसे ना हो पायेगा’ या टॅगलाईनखाली हे आंदोलन करण्यात आलं. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्येही आंदोलन होणार आहे.
आता ‘प्रेम नगरचा महाराजा’ही अपघातग्रस्त;
कुर्ल्यात गणेशमूर्तीचा ट्रॉली उलटून अपघात
मुंबईत गणेशमूर्तीच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेतील शीतल तलाव परिसरात स्पीड ब्रेकर ओलांडताना धारावीच्या ‘प्रेम नगरचा महाराजा’ या सुमारे १५ फुटी गणेशमूर्तीचा ट्रॉलीवरून तोल गेला. या अपघातात संतोष जैस्वार आणि रोहित जैस्वार हे दोन मंडळ कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोघांवर भाभा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र, मूर्तीचं नुकसान झाल्याने तिचं जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज तलावात विसर्जन करण्यात आलं. विशेष म्हणजे, भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू आणि पाच जण जखमी झाल्यानंतर ही घटना घडली आहे.
चंद्रपुरात अमृता फडणवीसांच्या हस्ते महारुद्र अभिषेक;
100 विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप
चंद्रपुरात महाराष्ट्रातील प्राचीन आणि मोठ्या शिवलिंगाच्या जीर्णोद्धारानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अमृता फडणवीस यांनी कावड यात्रेत सहभागी होत शिवलिंगाचं पूजन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते शिवलिंगावर महारुद्र अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून 100 शाळकरी विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. शाळेत जाणाऱ्या मुलींचा प्रवास सोपा व्हावा, हा या उपक्रमाचा उद्देश होता. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
बुलढाण्यात पिकं करपली, शेतकरी संकटात;
‘पालकमंत्र्यांना गांभीर्य नाही’ काँग्रेसचा आरोप
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग पिकं अक्षरशः करपून गेली आहेत. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावलंय. या परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विश्वदीप पडोळ यांनी केली. त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत कोरडा दुष्काळ, आगामी पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या संकटाची माहिती दिली. मात्र, पालकमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवरून त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दोघांमधील फोनवरील संभाषणाची कथित रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राहुल गांधींचा काँग्रेससाठी ‘मास्टरप्लॅन’!
घराणेशाहीला ब्रेक, तरुणांना थेट संधी
२०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापासूनच कंबर कसलीये. पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यासाठी राहुल गांधींनी नवा प्रयोग सुरू केलाय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदासाठी आता थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली जातेय. दिल्लीतील बैठकीत 30-40 उमेदवारांचे गट करून राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांनी मुलाखती घेतल्या. स्थानिक पातळीवर मजबूत पकड, पक्षासाठी केलेलं काम आणि आक्रमक तरुण नेतृत्वाला प्राधान्य दिलं जातंय. भारत जोडो यात्रेत कामगिरी करणाऱ्या SC, ST, OBC आणि खुल्या प्रवर्गातील तरुणांनाही संधी मिळणार आहे. तब्बल 120 सचिवांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसला नवी उभारी मिळणार का, याकडे लक्ष लागलंय.
इंजिनिअर, हायड्रॉलिक मशीन सगळं फेल!
८ फुटांचा ‘खडे हनुमान’ इंचभरही हलला नाही
2028च्या सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीसाठी उज्जैनमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. सती गेटजवळील तब्बल 170 वर्षे जुन्या ‘खडे हनुमान’ मंदिराचं स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाने मंदिराची वास्तू पाडली. मात्र, सुमारे 8 फूट उंच हनुमानाची मूर्ती हलवण्याचे चारही प्रयत्न फेल झाले. हायड्रॉलिक मशीन आणि तांत्रिक पद्धती वापरूनही मूर्ती इंचभरही हलली नाही. त्यामुळे सध्या ही घटना देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. काही तज्ज्ञांनी मूर्तीचा संबंध परमारकालीन किंवा राजा भोज यांच्या काळाशी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, ती 1000 वर्षे जुनी असल्याच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
ट्रम्पपेक्षा ७ पट जास्त पगार!
सिंगापूरच्या पंतप्रधानांचं वार्षिक उत्पन्न तब्बल २७ कोटींवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा तब्बल सातपट जास्त पगार सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांना मिळणार आहे. १५ ऑक्टोबरपासून वोंग यांच्या पगारात ६४ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांचं वार्षिक उत्पन्न ३.६ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स म्हणजेच जवळपास २६.९ कोटी रुपये होणार आहे. त्यामुळे ते जगातील सर्वाधिक पगार घेणारे सरकारप्रमुख ठरणार आहेत. सिंगापूरमध्ये सक्षम व्यक्तींना राजकारणात आणण्यासाठी उच्च वेतन दिलं जातं. मात्र, या पगारवाढीला जनतेकडून विरोध झाल्यानंतर वोंग यांनी पुढील पाच वर्षांत वाढीव पगारातील १.४ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स सामाजिक आणि धर्मादाय कामांसाठी दान करण्याची घोषणा केली आहे.
निळी जर्सी पुन्हा मैदानात!
आशियाई खेळांसाठी टीम इंडियाचा जुना लूक परत
आगामी आशियाई खेळांसाठी भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. हॉकी विश्वचषकात पुरुष आणि महिला संघांची जर्सी केशरी करण्यात आली होती. या निर्णयावर माजी हॉकीपटूंनी जोरदार टीका केली होती. निळ्या मैदानावर निळी जर्सी दिसत नसल्याने खेळाडूंना अडचण येते, असं कारण हॉकी इंडियाने दिलं होतं. मात्र, धनराज पिल्लेंसह अनेक माजी खेळाडूंनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. आता हॉकी इंडियाने निर्णय बदलत निळ्या जर्सीला पहिली पसंती दिली आहे. आशियाई खेळांसाठी भारताचा ‘अ’ गटात समावेश असून जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, श्रीलंका आणि इंडोनेशिया हे प्रतिस्पर्धी आहेत.
“उद्या मातृत्व स्वीकारलं तर…”;
‘अडकित्ता’मुळे सई ताम्हणकर पुन्हा चर्चेत Top 15 News :
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या आगामी ‘अडकित्ता’ सिनेमामुळे चर्चेत आहे. 11 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या सिनेमात सई नॅनीची भूमिका साकारतेय. यानिमित्ताने ‘कलाकृती’ला दिलेल्या मुलाखतीत तिने मातृत्वावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. सई म्हणाली की, कामाच्या निमित्ताने किशोरवयीन मुलाची किंवा लहान मुलाची आई कशी असते, याचे वेगवेगळे अनुभव घेता येतात. पण उद्या स्वतः मातृत्व स्वीकारलं, तर तो वेगळाच प्रयोग असेल. दरम्यान, ‘अडकित्ता’मध्ये सईसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले झळकणार आहेत.





