Asha Bhosle Video : आशा भोसले यांचं शेवटचं गाणं रिलीज..; व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू !
त्यांच्या ९३व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं शेवटचं रेकॉर्ड केलेलं चित्रपटगीत ‘ऐ मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ रिलीज करण्यात आलं आहे.

Asha Bhosle Video : ज्या आवाजाने अनेक दशकं रसिकांना कधी प्रेमात पाडलं, कधी डोळ्यांत अश्रू आणले, तर कधी तालावर थिरकायला भाग पाडलं, तो आवाज आज पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. स्वरसम्राज्ञी ‘आशा भोसले‘ आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आवाजाची जादू मात्र अजूनही कायम आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या ९३व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं शेवटचं रेकॉर्ड केलेलं चित्रपटगीत ‘ऐ मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ रिलीज करण्यात आलं आहे. त्यामुळे आशाताईंचा आवाज पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मिळाल्याने चाहते भावुक झाले आहेत.
याहून खास गोष्ट म्हणजे, केवळ गाणंच नाही तर त्याचा हृदयस्पर्शी पडद्यामागचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आशाताई स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.
त्या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता अंशुमन झा यांच्याशी संवाद साधताना, गाण्याबाबत चर्चा करताना आणि टीमसोबत अगदी आपुलकीने वावरताना दिसतात. त्यामुळे हा व्हिडीओ चाहत्यांसाठी केवळ एक म्युझिक व्हिडीओ न राहता आशाताईंच्या आठवणींचा अनमोल ठेवा ठरत आहे.
‘ऐ मेरी जिंदगी…’ ऐकून चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू
‘ऐ मेरी जिंदगी, तू छुपी है कहाँ’ हे गाणं ‘ओम का हरी’ या आगामी चित्रपटाचा भाग आहे. हे गाणं आशा भोसले यांनी २०२३च्या अखेरीस रेकॉर्ड केलं होतं, म्हणजेच त्या ९० वर्षांहून अधिक वयाच्या असतानाही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली होती. आता त्यांच्या निधनानंतर हे गाणं प्रदर्शित झाल्याने त्याला भावनिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
गाण्याला राजीव सारंग यांनी संगीत दिलं असून प्रदीप शर्मा खुसरो यांनी गीत लिहिलं आहे. हे गाणं आयुष्याचा आनंद, प्रेम आणि मनातील भावना वेळेत व्यक्त करण्याच्या महत्त्वाभोवती फिरतं. त्यामुळे ‘ओम का हरी’च्या कथेशीही या गाण्याचं नातं जोडलेलं आहे.
आशाताईंचा आवाज कायमचा आठवणीत…
आशा भोसले यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर भारतीय संगीतविश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली. आशाताईंनी सात दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने भारतीय संगीतविश्वावर राज्य केलं.
त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली आणि विविध भाषांमध्ये आपला ठसा उमटवला. त्यांच्या आवाजाची विविधता आणि गाण्यांच्या वेगवेगळ्या शैलींवर असलेली पकड यामुळे त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावशाली गायिकांपैकी एक ठरल्या.






