Top 15 News : जरांगेंच्या मुंबई आंदोलनाची तारीख आज ठरणार?, ब्रिक्समधून डॉलरला आव्हान? आणि ऋता दुर्गुळेच्या ‘गणेश वंदना’ने रंगला उत्सव, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. मुंबई आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

जरांगेंच्या मुंबई आंदोलनाची तारीख आज ठरणार?
अंतरवाली सराटीतील बैठकीकडे राज्याचे लक्ष
Top 15 News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. मुंबई आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर जरांगे पाटील मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना शांततामय आंदोलनापासून रोखण्यास नकार दिला असून, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने १५ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचा अभ्यासू आणि संयमी नेता हरपला;
ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी दुपारी एक वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाजन हे राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि तुरुंगवासही भोगला. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची बाजू संयमी आणि प्रभावीपणे मांडली. त्यांच्या निधनाने काँग्रेसने अभ्यासू आणि निष्ठावंत नेता गमावला आहे.
‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन प्रश्न सुटणार नाही’;
गिरीश महाजनांचा जरांगेंना सल्ला
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असून, मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण १४व्या दिवशीही सुरू आहे. आरक्षणाचा तोडगा न निघाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाहीर शिव्या देऊन मार्ग निघणार नाही, असे म्हटले. जरांगेंच्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने सनदशीर मार्गाने मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन ‘सगेसोयरे’ किंवा जात पडताळणी समिती रद्द करण्यासारख्या मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे महाजन म्हणाले. त्यांनी जरांगेंना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहनही केले.
१३ महिन्यांनंतर माधुरी हत्तीण स्वगृही
हजारो नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची माधुरी हत्तीण १३ महिन्यांनंतर स्वगृही परतली. न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर गुजरातमधील वनतारा येथून तिला नांदणीत आणण्यात आलं. वनताराचे सीईओ विवान कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली टीम माधुरीला घेऊन मठात दाखल झाली. यावेळी हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी करत तिचं जल्लोषात स्वागत केलं. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळणही करण्यात आली. विशेष म्हणजे, परतीनंतर माधुरीने नव्या घरात ठेवलेली फळं आणि ऊस खाल्ला.
गणेशोत्सवात पुन्हा पावसाचा जोर;
राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार सरींचा इशारा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्यांमुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूरसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जळगावात रात्री मुसळधार पावसासह वादळी वारे झाल्याने काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
‘नवी मुंबई महापालिकेला लुटण्याचा प्रयत्न करू नका’;
गणेश नाईकांचा इशारा Top 15 News :
नवी मुंबई महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या उत्पन्नातून विकास केला पाहिजे, अशी भूमिका मंत्री गणेश नाईक यांनी मांडली. महापालिका स्वायत्त असली पाहिजे, मात्र तिला लुटण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. री-डेव्हलपमेंटच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होऊ देणार नाही, असे नाईक म्हणाले. सोसायट्यांच्या तक्रारींबाबत सहकार मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या हक्काचे असल्याचे सांगत पनवेलला कायमस्वरूपी पाणी देण्यास त्यांनी विरोध केला. पाईपलाईन फुटल्यास टँकरने पाणी देऊ, मात्र कायमस्वरूपी पाण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असे नाईकांनी स्पष्ट केले.
‘मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची’;
जरांगे आंदोलनावर शशिकांत शिंदे आक्रमक
आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे आंदोलन रोखण्याऐवजी त्यावर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाचे आंदोलन नसून, हा प्रश्न सरकारनेच निर्माण केला असल्याचेही शिंदे म्हणाले. दरम्यान, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्याचा फटका त्यांच्या पालकांनाही बसत असल्याची टीका त्यांनी केली. अध्यक्ष आणि सचिवांना पदावर का बसवून ठेवले आहे, असा सवाल करत सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद;
दोन दिवसांतच FIR दाखल होणार
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सीबीआयने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जवळपास चार तास जबाब नोंदवला. त्यांच्या वकिलांनी लवकरच एफआयआर दाखल होईल, अशी माहिती दिली. न्यायालयाने प्रकरणातील सर्व रेकॉर्ड सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपासासाठी सीबीआयने उपअधीक्षक पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सतीश सालियन यांनी आरोपींची नावे देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केल्याचे सांगितले.
टाटा कंपनीतील कंत्राटी कामगार होणार कायम;
सुनील तटकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर मोठा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत टाटा कंपनीने स्थानिक कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे स्थानिक कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, गोदरेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने तटकरे यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला. दरम्यान, गुरुचरण जमिनीच्या हस्तांतरणापासून अनधिकृत गौण खनिज उत्खननापर्यंतच्या विविध प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या निर्णयामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सोलापुरात लक्ष्मण हाकेंची मराठा युवकांशी झटापट;
हॉटेलबाहेर गाडी अडवून धक्काबुक्की, दोघे ताब्यात
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच सोलापुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काही तरुणांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. मोहोळजवळील निसर्ग हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या हाके यांच्याशी काही तरुणांनी हुज्जत घातल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना बाहेर काढल्यानंतर हाके समर्थक बाहेर पडत असताना तरुणांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, इतर तरुण पसार झाल्याची माहिती आहे. घटनेप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जोरदार पावसाने बळीराजा सुखावला;
धान पिकाला मिळणार संजीवनी Top 15 News :
गोंदिया जिल्ह्यात आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या धान पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतजमिनीतील ओलावा वाढणार असून, धान पिकाला आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे.
ब्रिक्समधून डॉलरला आव्हान?
मोदी, पुतिन, पेझेश्कियन यांचा आर्थिक सहकार्यावर जोर
नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी आर्थिक सहकार्यावर भर दिला. मोदी यांनी जागतिक व्यापारासाठी सुरक्षित सागरी मार्ग, वाहतुकीचे स्वातंत्र्य आणि खलाशांच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. पुतिन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत उदयोन्मुख देशांचे महत्त्व वाढत असल्याचे सांगितले. तर पेझेश्कियन यांनी ब्रिक्स देशांमधील व्यापारात राष्ट्रीय चलनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या ब्रिक्सच्या भूमिकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी टीका केली आहे.
होर्मुझनंतर बाब अल-मंदेबही संकटात;
हौथी बंडखोरांचा मोक्याच्या पेरीम बेटावर ताबा
होर्मुझच्या सामुद्रधुनीनंतर आता बाब अल-मंदेब सामुद्रधुनीवरील संकट वाढले आहे. इराणसमर्थित हौथी बंडखोरांनी मोक्याचे पेरीम बेट आणि लाल समुद्रातील धुबाब शहर ताब्यात घेतल्याचे येमेनी सूत्रांनी सांगितले. बाब अल-मंदेब हा आशिया-युरोपदरम्यानचा महत्त्वाचा सागरी मार्ग असल्याने जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हौथींच्या या प्रगतीमुळे इराणला सामरिक फायदा होऊ शकतो आणि तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने हौथींविरोधात अमेरिकेकडे लष्करी मदत मागितल्याचे वृत्त आहे. मात्र, अमेरिकेने थेट हवाई कारवाईऐवजी गुप्तचर सहकार्यावर भर दिला आहे. या घडामोडींमुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा बाजारातील चिंता वाढली आहे.
रोहित शर्माच्या प्रोमोवरून वाद;
विराट कोहलीच्या चाहत्यांचा आक्षेप
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा लवकरच ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या गेमिंग शोमधून टेलिव्हिजनवर दिसणार आहे. मात्र, शोच्या प्रोमोवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. प्रोमोमध्ये रोहितने २०१४-१५च्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथशी संबंधित एक किस्सा सांगितला. या घटनेचा संबंध प्रत्यक्षात विराट कोहली आणि स्मिथ यांच्याशी असल्याचा दावा विराटच्या चाहत्यांनी केला आहे. यासाठी जुने व्हिडीओ आणि फोटोही शेअर केले जात आहेत. मात्र, संपूर्ण संदर्भ शो प्रसारित झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. हा शो १९ सप्टेंबरपासून सोनी टीव्ही आणि सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
ऋता दुर्गुळेच्या ‘गणेश वंदना’ने रंगला उत्सव;
‘आली मोठी शहाणी’चं नवं गाणं रिलीज Top 15 News :
आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील अभिनेत्री ऋता दुर्गुळेची ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणाऱ्या या गाण्यात भक्तिरसासोबतच गणेशोत्सवाचा उत्साह आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभय जोधपूरकर यांच्या भावपूर्ण आवाजाने गाण्याला भक्तीचा रंग दिला आहे. पंकज पडघन यांचे संगीत आणि गुरु ठाकूर यांचे शब्द गाण्याचे आकर्षण वाढवतात. चित्रपटाच्या कथेत गणपती बाप्पाशी जोडलेला भावनिक धागा महत्त्वाचा असून, ‘गणेश वंदना’तूनही तो अधोरेखित केला आहे. लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी याबाबत माहिती दिली आहे.





