Top 10 News : शिवसेना कोणाची आज ठरणार?, cjp पक्ष नाही, दबावगट तयार करणार आणि ऊर्मिला कानेटकरची क्रिप्टीक पोस्ट, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

शिवसेना कोणाची आज ठरणार?
सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी
Top 10 News : शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद केला. 2018 ची शिवसेना पक्षघटना वैध असून निवडणूक आयोगाला तिची वैधता तपासण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ आमदारांच्या संख्याबळावर मूळ पक्षाचा दावा करता येत नसल्याचा मुद्दाही मांडला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील अधिकाराबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.
आधी भाजपच्या निष्ठावंतांना डिवचलं
गदारोळ वाढताच अर्चना पाटलांचा यू-टर्न
धाराशिव भाजपमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे निर्माण झालेल्या वादावर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजपच्या जुन्या व निष्ठावंत नेत्यांनी गेल्या 30 वर्षांत पक्षासाठी काय योगदान दिले, असा सवाल करणारे स्टेटस त्यांच्या अधिकृत खात्यावर झळकल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी हा मजकूर सोशल मीडिया टीमकडून पूर्वपरवानगीशिवाय अनवधानाने प्रसिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित सर्वोच्च असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात पाऊस घालणार धिंगाणा?
१० जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
राज्यातील मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून अनेक भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. मुंबईतही पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
अजित पवार गटाला ठाण्यात मोठा धक्का;
युवक अध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले असून युवक अध्यक्ष विरू वाघमारे, सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ठाणे शहरातील नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देत नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “भटकलेले पक्षी पुन्हा घरट्यात परतले,” असे म्हणत आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. या घडामोडीमुळे ठाण्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
अभिजित दिपकेंची नवी राजकीय खेळी;
पक्ष नाही, दबावगट तयार करणार Top 10 News :
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) सध्या निवडणुका लढवणार नसून सरकारवर प्रभावी दबाव निर्माण करणारा गट म्हणून काम करणार असल्याची घोषणा संस्थापक अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय कॉन्क्लेवमध्ये केली. नीट पेपरफुटी आंदोलनानंतर राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या दिपकेंनी देशाला नव्या पक्षापेक्षा मजबूत दबावगटाची गरज असल्याचे म्हटले. शिवसेना, जनता पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आम आदमी पक्ष यांसारख्या चळवळींचा दाखला देत, आजचा दबावगट उद्याचा राजकीय पक्ष ठरू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
युसूफ पठाणसह 3 खासदारांचा NDAला ठाम नकार;
‘आम्ही भाजपसोबत नाही’ म्हणत बैठकीकडे पाठ”
माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण, अबू ताहेर आणि खलीलुर रहमान यांनी एनडीएच्या बैठकीला गैरहजर राहत भाजपला पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “आम्ही भाजप किंवा एनडीएचा भाग नाही,” अशी भूमिका तिन्ही खासदारांनी मांडली. टीएमसी सोडून एनसीपीआयमध्ये दाखल झालेल्या या नेत्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, एनडीए बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत विकासकामांवर चर्चा केली. विकासासाठी मुख्यमंत्री भेटणे आणि राजकीय आघाडीचा भाग होणे या वेगळ्या गोष्टी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लग्नात 8 ग्रॅम सोने, रेशमी साडी;
विजय सरकारची मोठी घोषणा
तमिळनाडूमधील टीव्हीके सरकारने महिलांसाठीच्या ‘सुवर्ण नाणे आणि रेशमी साडी’ योजनेसाठी अर्थसंकल्पात 812 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना विवाहावेळी 8 ग्रॅम सोने आणि एक रेशमी साडी दिली जाणार आहे. तसेच सरकारी रुग्णालयांत जन्मलेल्या नवजात बालकांसाठी सुवर्ण अंगठी योजनेसाठी 560 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या निवडणूक आश्वासनांपैकी या प्रमुख योजना आहेत. याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठीही मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली असून 717 मद्यविक्री दुकाने बंद केल्याचे सरकारने सांगितले आहे.
पाकिस्तानात तख्तापलटाची चर्चा;
शहबाज सरकार अडचणीत
पाकिस्तानात सत्ताबदलाच्या चर्चांना वेग आला असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारवर संकटाचे ढग दाटल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी देशातील मोठ्या घोटाळ्याचा दावा करत न्यायाधीश, नोकरशहा, राजकारणी आणि बँकरांवर गंभीर आरोप केले आहेत. राजधानी इस्लामाबादमध्ये तणावाचे वातावरण असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, नकवी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या जवळच्या संबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पाकिस्तानात तख्तापलट होणार असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
क्रिकेट अन् मद्यपानाचं नातं अजूनही कायम;
बेन स्टोक्सच्या वक्तव्याने खळबळ
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने क्रिकेटमधील मद्यपान संस्कृतीवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना स्टोक्स म्हणाला की, मद्यपान ही केवळ इंग्लंड संघाची समस्या नसून क्रिकेटच्या संस्कृतीतच अनेक वर्षांपासून रुजलेली बाब आहे. क्लब क्रिकेटपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हे वास्तव कायम असल्याचा दावा त्याने केला. पोषण, वैद्यकीय सुविधा आणि व्यावसायिकता वाढली असली तरी क्रिकेट आणि मद्यपान यांचे नाते बदलले नसल्याचेही तो म्हणाला. त्याच्या वक्तव्यावर क्रिकेटविश्वातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ऊर्मिला कानेटकरची क्रिप्टीक पोस्ट
‘कर्मा’चा केला उल्लेख Top 10 News :
मराठी अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला होता. आता घटस्फोटानंतर 21 दिवसांनी ऊर्मिलाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. “परिस्थिती हाताळण्याची कर्माची एक धक्कादायक आणि अनोखी पद्धत असते. तुम्हाला फक्त शांतपणे बसून ते पाहायचे असते,” असे तिने लिहिले. पोस्टमध्ये कोणाचेही नाव किंवा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्याने तिच्या या संदेशाबाबत सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, याबाबत ऊर्मिलाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.





