Top 10 News :”बाटलीतली भुतं आता अंगाशी”, देशात पेट्रोल डिझेलच्या दरात होणार वाढ? आणि ‘काकुळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पुन्हा निशाणा साधला आहे.

गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा;
‘बाटलीतली भुतं आता अंगाशी’
Top 10 News : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पुन्हा निशाणा साधला आहे. राज्यात धर्म, जात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलने सुरू असून, काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नसल्याची टीका नाईकांनी केली. ‘बाटलीतली भुतं बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येत आहेत. काढलेली भुतं पुन्हा बंद करण्याची ताकद ज्यांच्यात असेल, त्यांनीच ती बाहेर काढावीत,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाईकांनी ही टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, बीडमध्ये रास्ता रोकोप्रकरणी ३९ आंदोलकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गणरायाच्या आगमनाआधी राज्यात पावसाचा जोर;
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना राज्यभरात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवत असून अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना यांसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसासोबत वादळी वारे आणि वीजांचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल;
वादग्रस्त वक्तव्य भोवले
भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात काढण्यात आलेल्या रॅलीवरून आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी महिलांच्या शरीरयष्टीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हे वक्तव्य महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचवणारे असल्याचा आरोप करत ४२ वर्षीय महिलेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मध्यरात्री गायकवाडांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणामुळे बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मानाचे पाच गणपती सज्ज;
पुण्यात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. मानाचे पाच गणपती आणि प्रमुख गणेश मंडळांनी आकर्षक देखावे आणि प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण केली आहे. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींसह दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे देखावे यंदा आकर्षण ठरणार आहेत. विविध मंडळांच्या स्वागत मिरवणुकीत ढोल-ताशा, बँड आणि पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी;
धाराशिवच्या जेवळीत खळबळ Top 10 News :
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात चक्क ६ ते ७ दातांची कवळी सापडल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणल्यानंतर त्यांच्या सुनेला तांदुळात ही कवळी आढळली. कवळी काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ती मानवी आहे की प्राण्याची, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून रेशनच्या धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महिनाभराच्या खंडानंतर पावसाची हजेरी;
माना टाकलेल्या पिकांना नवसंजीवनी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाअभावी माना टाकलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांवर संकट निर्माण झाले होते. आता झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेतशिवारात पाणी साचले आहे. मात्र, पिकांची वाढ आणि उत्पादनासाठी आणखी दमदार व सातत्यपूर्ण पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आता जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणापासून ड्रग्सविरोधी कारवाईपर्यंत;
अनिल पाटलांनी मांडली भूमिका
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन समाजासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. यासोबतच संजय राऊत, विजय वडेट्टीवार, ध्वनीप्रदूषण, युतीधर्म आणि ड्रग्सविरोधी कारवाई यांसारख्या मुद्द्यांवरही अनिल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कमी पावसाने सरकार अलर्ट;
जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारपर्यंत नुकसानीचा अहवाल
राज्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेत प्रभावित भागात तातडीने प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. पाणीस्थिती, पावसाचे प्रमाण आणि पिकांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी मदत पॅकेजसह विविध निर्णय होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सिंचनाच्या समस्यांवर स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
‘जरांगेंच्या मागे आता समाज राहिला नाही’;
नवनाथ वाघमारेंची टीका
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘जरांगेंच्या मागे आता समाज राहिला नाही आणि त्यांच्या माध्यमातून काही मिळणार नाही,’ असा दावा त्यांनी केला. मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करून जरांगे आणि त्यांची टीम स्वतःचे हित साधत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. गोरगरीब मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जरांगे मुंबईला जाण्याच्या केवळ वल्गना करत असल्याची टीका करत, त्यांनी मुंबईला जाण्याची तयारी केल्यास सरकार त्यांना रोखेल, असा आक्रमक दावा वाघमारे यांनी केला.
मी बुलढाण्याची सून, चिखलीची लेक’;
श्वेता महालेंचा विरोधकांना टोला
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होण्याची शक्यता असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले. पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली. पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून आमदार गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. कार्यक्रमाचे नियोजन मित्रपरिवाराने केले असून त्यासाठी कोणताही खर्च झालेला नाही, असा दावा महाले यांनी केला. ‘जनताजनार्दन माझ्यासाठी मायबाप आहे. मी बुलढाण्याची सून तर चिखलीची लेक आहे,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महिलांबाबतच्या वक्तव्यावरूनही त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर टीका केली.
देशात पेट्रोल डिझेलच्या दरात होणार वाढ?;
सौदीची तेल पाइपलाइन बंद, कच्च्या तेलाच्या दराने घेतली झेप Top 10 News :
सौदी अरेबियाने ड्रोन हल्ल्यानंतर सुमारे १,२०० किलोमीटर लांबीची ईस्ट-वेस्ट कच्च्या तेलाची पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. ही पाइपलाइन होर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा घालून यान्बू बंदरापर्यंत तेल पोहोचवते आणि तेथून भारतासह आशियाई देशांना पुरवठा केला जातो. त्यामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचा दर १०० डॉलरच्या पुढे गेला असून गुरुवारी तो १०९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. सौदी अरेबिया हा भारताचा तिसरा मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चिंता वाढली आहे.
PFच्या नियमांत मोठा बदल;
आगाऊ पैसे काढण्याचे नियम झाले सोपे
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF मधून आगाऊ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये EPFO ने बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार आगाऊ रकमेच्या दाव्यांची अत्यावश्यक गरजा, घराच्या गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी पैसे काढण्यावर मर्यादा नसणार आहे. उच्च शिक्षणासाठी १० वेळा, तर विवाहासाठी पाच वेळा आगाऊ रक्कम काढता येईल. घर खरेदी, बांधकाम किंवा दुरुस्तीसाठीही पाच वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, या सुविधेसाठी EPF सदस्यत्वाला १२ महिने पूर्ण असणे आवश्यक आहे. पात्र सदस्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
मोदी-जिनपिंग भेटीत ७ मुद्द्यांवर सहमती;
LACसह व्यापारावर मोठी चर्चा
दिल्लीतील भारत मंडपम येथे ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली. सात वर्षांनंतर जिनपिंग भारतात आल्याने या भेटीकडे जगाचे लक्ष लागले होते. बैठकीत सीमा प्रश्न, व्यापार, सांस्कृतिक संबंध आणि नागरिकांमधील संपर्क वाढवण्यासह सात मुद्द्यांवर सहमती झाली. LACवर कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता ही संबंध सुधारण्याची प्रमुख पायाभरणी असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ब्रिक्स जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मात्र, सीमावाद आणि भारताचा चीनसोबतचा व्यापार तुटवडा ही दोन प्रमुख आव्हाने कायम आहेत.
BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या नियमांत मोठा बदल?
फिटनेस आणि उपलब्धतेवर मिळणार करार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या नियमानुसार खेळाडूची कामगिरी आणि ज्येष्ठतेसोबतच त्याचा फिटनेस आणि संघासाठी उपलब्धता याचाही विचार केला जाऊ शकतो. संपूर्ण मोसमात खेळाडू किती सामने खेळला किंवा किती सामन्यांसाठी उपलब्ध होता, यासाठी किमान मर्यादा निश्चित करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धांना मुकले. त्यामुळे खेळाडूंनी फिट राहून संघासाठी जास्तीत जास्त उपलब्ध राहावे, हा या बदलामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप प्राथमिक चर्चेच्या टप्प्यात असून अंतिम निर्णय झालेला नाही.
मोनालिसा बागल दिसणार ‘काकुळ’मध्ये;
नोव्हेंबरमध्ये रहस्य-थराराचा अनुभव Top 10 News :
अभिनेत्री मोनालिसा बागल आता ‘काकुळ’ या रहस्य-थरारपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्निल गोगावले एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सूरज रघुनाथ पडवळ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मोनालिसासोबत अक्षय टंकसाळे, संजय खापरे, यश डिंबळे यांच्यासह अन्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रहस्य, भय आणि सामाजिक सूडभावना हे चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्त्रीविरोधी मानसिकता, पुरुषसत्ताक वृत्ती आणि वाईट कर्मांची फळे या विषयांवर ‘काकुळ’ची कथा आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना थरारासोबत सामाजिक संदेशही मिळणार आहे.





