फडणवीसांचे ठाकरे,सपकाळ,शिंदेंसह तटकरेंना पत्र Top 10 News : महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र पाठवल्याची माहिती आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनिल तटकरे अशा सर्वांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असे या पत्रातून नमूद करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी सर्वांना हे पत्र पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. बहिणीच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची पोस्ट अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची 13 एप्रिलला शिर्डी पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता रुपाली चाकणकर यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले. त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा नांदेडमधील शिदेसेनेच्या आढावा बैठकीत आमदार संतोष बांगरांनी पक्षाला घरचा आहेर दिला. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीय, डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा असं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत यांच्या समोरच त्यांनी हे विधान केलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिंदेसेनेच्या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नांदेड शहरात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी बांगर यांनी केली. ही मागणी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर करण्यात आली. काँग्रेसचं ‘संघटन सृजन अभियान’वादाच्या भोवऱ्यात राज्यात सध्या काँग्रेसच्या संघटनेच्या पुनर्गठनासाठी ‘काँग्रेस संघटन सृजन अभियान’ सुरू आहे. मात्र नागपुरात काँग्रेसचा हेच ‘संघटन सृजन अभियान’ पक्षातील अंतर्गत वादाचे कारण ठरले आहे. संघटनेच्या पुनर्रचनेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून केंद्रीय निरीक्षक म्हणून अरुण यादव, तर महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीकडून पर्यवेक्षक म्हणून जिया पटेल आणि इतराना पाठविण्यात आले आहे. मात्र, पर्यवेक्षक म्हणून आलेल्या जिया पटेल यांची काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांसोबतची एका हॉटेलमधील भेट वादाचा कारण बनलीय. काँग्रेसच्या एका गटाने पर्यवेक्षक जिया पटेल यांच्या भूमिकेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. जिया पटेल यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतल्याचा आणि चिकन पार्टी केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य अभिजीत झा यांनी केलाय. तर पक्षविरोधी कारवाया करण्याचा आरोप लागलेल्या ज्या स्थानीक नेत्यांशी जिया पटेल भेटले त्यांनी जिया पटेल यांच्या भूमिकेचा समर्थन केलंय.त्यामुळं हा वाद निर्माण झालाय. राज्यावर सूर्यदेव कोपले Top 10 News : एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत 35 अंश तर उपराजधानी नागपूरमध्ये 41 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात विर्दभात उन्हाचा तडाखा जास्त आहे. अकोला 44 अंश तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. एव्हढच नाही तर जगातील पहिल्या 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरांचा समावेश झालाय. हवामान विभागाने पुढील 8 दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे पारा 45 अंशांच्या पार जाण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येतीय. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन तज्ञांनी केलंय. अमरावतीत 180 मुलींचं लैगिक शोषण राज्यात खरात प्रकरणानं महिलांच्या शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असतानाच शिक्षणाच्या नावाखाली तरुणींचं लैगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघ़डकीस आलाय. प्रेमाच्या नावाखाली वासनेचा बाजार मांडणाऱ्या अयान अहमद या 19 वर्षाच्या तरूणानं तब्बल 180 तरुणींचे लैगिक शोषण करून 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय.याप्रकरणी पोलिसांनी अयानला ताब्यात घेऊन पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी तीन दिवसांपासून पीडित तरुणींचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाही पोलिसांनी ‘सुमोटो’ कारवाई का केली नाही? असा सवालही आता उपस्थित केला जातोय. खर तर हे प्रकरण केवळ एका शहरापुरतं मर्यादित नाही, तर याची पाळमुळं मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत गेली असल्याची शक्यता वर्तवली जातेय. बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणातल एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली चार दशकं फिरत होतं. आता लालू-नितीश पर्वाचा अस्त होत असून इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण आता नव्या वळणावर आल्याचं चित्र आहे. इतिहासात पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे.भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांच्या निवडीची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली. सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी आहे. ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. तारापूर मतदारसंघातून ते आमदार असून परबत्ता मतदारसंघातूनही दोन वेळा निवडून आले आहेत. ते दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिले असून माजी मंत्री शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यनंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी मिळतेय. चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये होण्याची शक्यता आहे.इराण आणि अमेरिकेच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर संवाध साधला. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची जवळपास 40 मिनिटं फोनवरुन चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. विविध क्षेत्रांमध्ये आमच्या द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. सर्वच क्षेत्रांमध्ये आमची सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ खुला व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. कोलकाता नाइट रायडर्सचा चौथा पराभव आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. विजयासाठी 193 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला विजय मिळवता आला नाही.केकेआरनं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 160 केल्या. चेन्नईनं केकेअआरला पराभूत करत दुसरा विजय मिळवला. चेन्नईनं कोलकाता नाइट रायडर्सवर 32 धावांनी विजय मिळवला.या चौथ्या पराभवामुळं कोलकाता गुणतालिकेत तळाला पोहोचलाय. बिग बॉसमधून हा स्पर्धक घराबाहेर Top 10 News : अभिनेता रितेश देशमुख होस्ट करत असलेला रिॲलिटी शो ‘बिग बॉस मराठी ६’ आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. लवकरच शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. गेल्याआठवड्यात राखी सावंतने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला आहे. राखीनंतर घरात नुकतेच मिड-वीक एलिमिनेशन पार पडले आहे. घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ च्या शेवटच्या एलिमिनेशनमध्ये हटके टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये एका बोर्डवर सात चौकटी होत्या. यामध्ये काही किल्ल्या ठेवण्यात आल्या होत्या. यात किल्ल्यांच्या बाजूला असलेल्या क्यू कार्ड्सवर स्पर्धकांसाठी खास मेसेज लिहून ठेवण्यात आले होते. या टास्कमध्ये राकेश बापट पहिला सेफ होतो आणि ‘बिग बॉस मराठी ६’चा दुसरा फायनलिस्ट ठरतो. त्यानंतर तिसरी फायनलिस्ट अनुश्री माने आणि चौथ्या फायनलिस्ट विशाल कोटीयन ठरतो. शेवटच्या क्षणी Danger झोनमध्ये दिपाली सय्यद आणि रेवा कौरासे उरतात. घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. घरातील सदस्यांना अश्रू अनावर होतात. अखेर या आठवड्यात मिड-वीक एलिमिनेशनमध्ये रेवा कौरासेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतलाय.