Top 10 News : 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधानांचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ गाण्यावरून राजकुमार राव ट्रोल, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून आजही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मुसळधार पाऊस;
पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी
Top 10 News : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून आजही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर यलो अलर्ट असून विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. दरम्यान, 25 जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याची, तर 26 आणि 27 जुलैला हवामानात आणखी सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद;
जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी
महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने मोठा बदल करत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील मॅनेजमेंट कोटा रद्द केला आहे. CET Cell ने याबाबतची अधिसूचना जारी केली असून आता सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन, मेरिट आणि गुणांच्या आधारे होतील. खासगी महाविद्यालयांना थेट प्रवेश देता येणार नाही. शेवटच्या फेरीत प्रवेश न घेतल्यास दोन वर्षे अर्ज करता येणार नाही, तर बारावीत बायोटेक्नॉलॉजी विषय असलेले विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं;
सरकारच्या तीन महत्त्वाच्या आश्वासनांनंतर निर्णय
NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी 26 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण स्थगित केले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. सरकारने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करण्याचे, पेपरफुटी व शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्याचे आणि NEET पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही मागणी कायम असल्याने आंदोलनाचा मुद्दा अद्याप कायम आहे.
आम्ही आमच्या निर्णयावर ठाम
वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर दीपकेंची प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण स्थगित केले असले, तरी कॉकरोच जनता पार्टीने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया देताना, “सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या असामान्य धैर्य, त्याग आणि देशातील विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या लढ्याला आम्ही मनापासून सलाम करतो. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण देशाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले,” असे म्हटले. तसेच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जंतर-मंतर येथे सुरू असलेले पक्षाचे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश;
मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय Top 10 News :
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे संबोधित करत, पेपरफुटी हा अत्यंत गंभीर गुन्हा असून दोषींवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सरकारने आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पेपरफुटी प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असून, दोषींना कठोर शिक्षा देणारे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल, असे आश्वासनही मोदी यांनी दिले.
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार;
जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगा याठिकाणी अवघ्या 24 तासांत 1,064 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून, हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक 24 तासांचा पाऊस ठरला आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे 1,200 नागरिकांची सुटका करण्यात आली, तर शेकडो जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तापी जिल्ह्यात पावसाशी संबंधित एका घटनेत एकाचा मृत्यू झाला. हवामान तज्ज्ञांच्या मते, स्थानिक आणि मान्सूनशी संबंधित वातावरणीय प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे उत्तर कोकण-दक्षिण गुजरात पट्ट्यात हा विक्रमी पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मोठ्या गोंधळानंतर केंद्र सरकारची कारवाई!
शिक्षण विभागातील IAS अधिकाऱ्याची हकालपट्टी
पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय बदल केला आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांना पंचायती राज मंत्रालयात नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी 1994 बॅचचे आयएएस अधिकारी नरेश पाल गंगवार यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. NEETसह विविध परीक्षांतील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात आंदोलन सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सुधारणा घडवून आणण्याचे मोठे आव्हान आता गंगवार यांच्यासमोर असणार आहे.
बांग्लादेशच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार;
राष्ट्राध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत?
बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन लवकरच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेल्या कथित संपर्कानंतर सरकार नाराज असून, सत्ताधारी बीएनपी राष्ट्रपतीपदावर बदल करण्याच्या तयारीत आहे. जुलै-ऑगस्ट 2024 मधील सत्तांतरानंतरही शहाबुद्दीन पदावर कायम आहेत. दरम्यान, शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची घोषणा केली असून, त्यांच्या परतल्यानंतर त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला विजय
वैभव सूर्यवंशींचीही धडाकेबाज कामगिरी
भारताने हरारे येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 7 बाद 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 14 व्या षटकातच लक्ष्य गाठले. वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 18 चेंडूत 50 धावांची धडाकेबाज खेळी करत विजयाचा पाया रचला. ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला विजय असून, संघाने पराभवाची मालिका खंडित करत विजयाच्या मार्गावर पुनरागमन केले.
‘मोदी है तो मुमकिन है’ गाण्यावरून राजकुमार राव ट्रोल;
‘तो दबाव तुम्हाला समजणार नाही’ म्हणत दिले उत्तर Top 10 News :
नीट पेपरफुटी प्रकरणावरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर अभिनेता राजकुमार राव सोशल मीडियावर ट्रोल झाला. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून घेण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करणारी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याने पूर्वी केलेल्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या गाण्याचा उल्लेख करत टीका केली. त्यावर उत्तर देताना राजकुमार राव याने, “मी माझा विवेक कधीच विकू शकत नाही. एखादे गाणे माझी तत्त्वे ठरवत नाहीत. मी नेहमी माणुसकी आणि योग्य गोष्टींच्या बाजूने उभा आहे.” अस म्हणत ट्रोलर्सला उत्तर दिल. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.




