Top 10 News : चाकण तळेगाव वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ,राहुल गांधींचा नाशिक दौरा आणि गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : चाकण औद्योगिक वसाहतीतील तीव्र वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने तोडगा काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

चाकण तळेगाव वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार;
उपमुख्यमंत्री शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा
Top 10 News : चाकण औद्योगिक वसाहतीतील तीव्र वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने तोडगा काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत संबंधित विभागांना सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. चाकण-तळेगाव हे औद्योगिक केंद्र असल्याने येथील समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. रस्त्यांसाठी जागा देण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एका महिन्यात अतिक्रमणांवर कारवाई करून बदल दाखवण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधींचा नाशिक दौरा;
काँग्रेसचं ‘GEN Z’ वर फोकस
राज्यात सध्या कोणतीही निवडणूक नसतानाही काँग्रेसने आपली रणनीती बदलत ‘अलर्ट मोड’वर येण्याचे संकेत दिले आहेत. राहुल गांधी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून, नाशिकमध्ये काँग्रेसकडून १० दिवसीय ‘सृजन अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात GEN Zच्या प्रश्नांवर विशेष भर दिला जाणार असून, तरुणांना पक्षाशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राहुल गांधी GEN Zसोबत संवाद साधणार असून, काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या या रणनीतीवर भाजपने टीका केली असून, नाशिकमधील तरुणाईचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच;
आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यात येत्या काही दिवसांत १,४४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून, आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘जन आरोग्य संवाद’ उपक्रमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून, आणखी चार लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आहे. आरोग्यविषयक तक्रारींसाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात पावसाचा धुमाकूळ;
‘या’ ५ जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसावर परिणाम होत असून, इतर भागांतही तुरळक पावसाची शक्यता आहे.
संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून नागरिक चक्रावले
पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले Top 10 News :
पेण शहरातील संभाजी महाराज चौकात उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. लो-पॉली या आधुनिक कलाशैलीत तयार केलेला हा पुतळा सिंहाचा जबडा फाडतानाचा प्रसंग दर्शवतो. मात्र, पुतळ्यावरून संभाजी महाराजांची ओळख सहज पटत नसल्याने शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनीही पुतळा हटवून संभाजी महाराजांच्या कीर्तीला साजेसा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून पेण नगरपालिकेवर टीकेची झोड उठली आहे.
UGC-NETच्या तीन विषयांची परीक्षा पुन्हा होणार
पेपरमध्ये निघाल्या ढीगभर चुका
UGC-NET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने NTAने इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा २२ ते ३० जूनदरम्यान परीक्षा झाली होती. मात्र, या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न, भाषांतर, व्याकरण, विरामचिन्हे तसेच अभ्यासक आणि पुस्तकांच्या नावांमध्ये चुका आढळल्या. काही प्रश्न आधीच्या परीक्षांमध्ये विचारले गेल्याचेही समोर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. इंग्रजी आणि कॉमर्सची परीक्षा ९ सप्टेंबरला, तर समाजशास्त्राची परीक्षा १० सप्टेंबरला होणार आहे.
राहुल गांधींच्या पत्रानंतर झारखंडचा पेच सुटणार ;
सरकार विद्यार्थ्यांशी चर्चेला तयार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्र लिहिल्यानंतर राज्य सरकार आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार झाले आहे. सोमवारी १७ ऑगस्ट रोजी स्टेट गेस्ट हाऊसमध्ये सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चर्चा होणार आहे. भरती परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विद्यार्थी २३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सर्व परीक्षा रद्द करून सीबीआय चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या पुतळ्यांचे दहन केले होते. आता चर्चेतून तोडगा निघणार का, याकडे लक्ष लागले आहे.
गाझा शांततेसाठी कुशनर-हमासमध्ये महत्त्वाची चर्चा
चर्चेनंतर कुशनर नेतान्याहू यांची भेट घेणार
गाझातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि विशेष दूत जेरेड कुशनर यांनी इजिप्तमध्ये हमासचे नेते खलील अल-हय्या यांची भेट घेतली. गाझातील शस्त्रसंधी आणि ट्रम्प प्रशासनाच्या १५ कलमी शांतता आराखड्याच्या पुढील टप्प्यावर चर्चा झाली. हमासने इस्रायलकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत लष्करी कारवाई थांबवण्याची आणि इस्रायली सैन्याच्या माघारीची मागणी केली. तर अमेरिकेने हमासच्या शस्त्रनिरस्त्रीकरणावर भर दिला आहे. या चर्चेनंतर कुशनर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेणार आहेत.
रोहित शर्मासाठी ओडिशाहून मुंबईपर्यंत सायकल प्रवास!
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली. ओडिशातील सुनील रौत हा चाहता चक्क सायकलवरून मुंबईत रोहितला भेटण्यासाठी आला. त्याचा हा प्रवास फळला असून, त्याला रोहितसोबत भेटण्याची आणि फोटो काढण्याची संधी मिळाली. सुनीलने रोहितला फोटो फ्रेम, राधा-कृष्ण आणि भगवान जगन्नाथाची मूर्ती भेट दिली. रोहितनेही त्याच्या भेटवस्तू स्वीकारल्या. विशेष म्हणजे, नोएडाहून ३९ वर्षीय आणखी एक चाहता सायकलवरून मुंबईत आला होता. त्याचीही रोहितसोबत भेट झाली. या दोन्ही चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप;
कुटुंबियांनी गुपचूप उरकले अंत्यसंस्कार
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल अनन्या राज यांचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन झाले. कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. १५ जुलै रोजी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गेल्या वर्षभराहून अधिक काळ त्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंज देत होत्या, अशी माहितीही निवेदनात देण्यात आली आहे. अनन्या राज यांनी २०१६ मध्ये ‘७ अवर्स टू गो’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘द फायनल एक्झिट’, ‘घोस्ट’ आणि ‘थग्गेदेले’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.





